Breaking News

भारत पाकिस्तानला पुन्हा धूळ चारणार?

लंडन, दि. 30 - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 4 जून रोजी होणार आहे. बर्मिंघमच्या मैदानावर  होणार्‍या या मच अवेटेड सामन्यात मैदानात उतरण्यासाठी उभय संघ सज्ज झाले आहेत. या सामन्यातील रंजक गोष्ट म्हणजे चार वर्षांपूर्वी भारत आणि पाकिस्तान संघ  याच मैदानात आमनेसामने आले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने गतविजेत्या टीम इंडियाचा डकवर्थ लुईस नियमानुसार 8 विकेट  राखून विजय झाला होता.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दहाव्या सामन्यात 15 जून 2013 रोजी भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडले होते. त्यावेळी एकही पराभव न स्वीकारता टीम इंडिया विजय  रथावर आरुढ होती. तर पाकिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या वहिल्या विजयासाठी भारताविरुद्ध लढणार होता. नाणेफेक जिंकून भारताने पाकिस्तानला  फलंदाजीसाठी निमंत्रित केलं होतं. पावसाने व्यत्यय आणल्याने थांबत थांबत खेळ सुरु होता. भारतीय गोलंदाजांनी त्या सामन्यात पाकिस्तानला 39.4 षटकात 165  धावातच रोखलं.
पावसामुळे हा सामना 40 षटकांचा करण्यात आला. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 40 षटकात 166 धावांची गरज होती. भारताची सलामी जोडी शिखर धवन  आणि रोहित शर्मा यांनी सुरुवातीची 8 षटकं खेळल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सामना 36 षटकांचा करण्यात आला. डकवर्थ लुईस नियमानुसार  टीम इंडियाला 22 षटकांमध्ये 102 धावांचं आव्हान देण्यात आलं. टीम इंडियाने 8 विकेट राखून हा सामना जिंकला.