Breaking News

यात्रा-आंदोलने करणा-यांची दुकानदारी बंद होणार - देवेंद्र फडणवीस

सांगली, दि. 30 - राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार यासह अनेकविध योजनांमुळे अनेकांची यापुढील कालावधीत यात्रा व  आंदोलनाची दुकाने आपोआप बंद पडणार आहेत, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना  सोमवारी लगावला. सर्वसामान्य शेतक-यांचा विसर पडल्यानेच 15 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला घरी बसावे लागले. या आघाडीचा व  आपल्या अडीच वर्षातील कामाचा लेखाजोखा एकाच व्यासपीठावर येऊन मांडायची आपली तयारी आहे, असे आव्हानही त्यांनी दिले. 
वाळवा तालुक्यातील कृषी महाविद्यालयास व रस्त्यांसाठी भरीव निधी दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा इस्लामपूर येथील यल्लम्मा  चौकात नागरी सत्कार करण्यात आला. यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात इस्लामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे  सांगली ग्रामीण जिल्हा अध्यक्ष माजी आमदार विलासराव शिंदे यांचे चिरंजीव महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वैभव शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात  प्रवेश केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.
जीएसटी मंजूर करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते आमदार जयंत पाटील यांनी भाजपचे  नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन कटाप्पाने बाहुबलीला का मारले, असा प्रश्‍न उपस्थित करून भाजपला अडचणीत आणले होते. परंतु या प्रश्‍नाचे थेट  उत्तर न देता देवेंद्र फडणवीस यांनी आज सारा रोख राजू शेट्टी यांच्यावर रोखल्याचे दिसून आले. देवेंद्र फडणवीस बोलत असताना सदाभाऊ खोत स्मितहास्य करीत  असल्याचे दिसून आले.
कोणतेही आंदोलन न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एफआरपीमध्ये 250 रूपयांची भरीव वाढ दिली आहे. त्यामुळे यापुढील  कालावधीत साडे नऊ टक्के साखर उतार्याला प्रतिटन दोन हजार 550 रूपये दर मिळणार आहे, असे सांगून सदाभाऊ खोत म्हणाले की, काहीजण विनाकारण केंद्र व  राज्यातील भाजप सरकारवर टीका करीत आहेत. वास्तविक, या सरकारने तूर उत्पादकांना दिलासा देण्यासाठी 56 लाख क्विंटल तूर खरेदी केली आहे. पहिल्यांदाच  राज्यात उच्चांकी तूर खरेदी करण्यात आली आहे. यापूर्वी इतकी तूर खरेदी कधीच झाली नाही. हे सरकार शेतकर्यांच्या सन्मानासाठीच काम करीत आहे, असेही ते  म्हणाले.
ऊस खरेदी कर माङ्ग करण्यात आल्याने सहकारी साखर कारखानदारांचा 700 कोटी रूपयांचा फायदा झाला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्याला चांगला ऊसदर  देणे शक्य होणार आहे. शेतकर्याचा मुलगा असल्याने पेरणी कधी करायची, याची चांगली जाण आपणाला आहे. जोमदार उगवून आलेल्या पिकाची राखण कशी  करायची, पाखरं हाकण्यासाठी गोफण कधी मारायची, हेही चांगलेच माहिती आहे. या शेतकरी चळवळीत गेली 30 वर्षे काम करताना अनेकदा संघर्ष केला. त्यावेळी  धनदांडग्यांसह अनेक विरोधकांना अंगावर घेतले. सध्या आपण शांत आहोत, याचा अर्थ आपण घाबरलो असा नाही. विनाकारण कोणी डिवचण्याचा व खलनायक  करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी दिला.
या शेतकरी मेळाव्यास पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, सांगली ग्रामीण जिल्हा अध्यक्ष  माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, पश्‍चिम महाराष्ट्र मुख्य समन्वयक मकरंद देशपांडे व प्रदेश उपाध्यक्षा श्रीमती नीता केळकर आदी उपस्थित होत्या. युवा मोर्चाचे प्रदेश  उपाध्यक्ष विक्रम पाटील यांनी आभार मानले. येत्या काही दिवसात सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना पाचारण करून उर्वरित भागातील राष्ट्रवादी  काँग्रेसच्या अनेक नेते व कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा मेळावास्थळी सुरू होती.