Breaking News

तीन वर्षात राज्यातील चाळीस हजार तलावांचे पुनरूज्जीवन - फडणवीस

लातूर, दि. 26 - जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात येणारे पाण्याचे काम हे महत्त्वपूर्ण असे राष्ट्रीय काम आहे. आपणास हे काम करण्याची संधी मिळाली आहे,  असे समजून हे काम करावे. पाणी जेथे असते तेथे समृद्धी असते असे म्हटले जाते. त्यासाठीच येत्या तीन वर्षात राज्यातील चाळीस हजार तलाव पुनरुज्जीवित  करण्याचा प्रयत्न आहे. लातूर जिल्हा राज्यातील पहिला बेघरमुक्त जिल्हा करा, असे आवाहन करुन, लातूर जिल्ह्यातील अधिकार्यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमावरील  (फ्लॅगशीप) योजना उत्कृष्टरित्या राबविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार्यांचेही या बैठकीत अभिनंदन केले.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस कामगार, भूकंप पुनर्वसन, कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री संभाजी  पाटील-निलंगेकर, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, महापौर सुरेश पवार, खासदार डॉ. सुनील गायकवाड, खासदार रवींद्र गायकवाड, आमदार सर्वश्री  त्र्यंबक भिसे, बस्वराज पाटील, विनायक पाटील, सुधाकर भालेराव, मुख्यमंत्री कार्यालयातील अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस  महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, लातूरचे उपमहापौर देवीदास काळे, औरंगाबाद विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी  अधिकारी डॉ.माणिक गुरसळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड, तसेच विविध विभागांचे प्रमुख, अंमलबजावणी यंत्रणांतील अधिकारी आदींची  उपस्थिती होती. जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, स्वच्छ भारत मिशन, पीक कर्ज पुनर्गठन, प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक  योजना, तूर खरेदी, लातूर शहरातील पाणी पुरवठा, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार अशा विविध महत्त्वाकांक्षी योजनांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वंकष आढावा  घेतला.
लातूर जिल्ह्याने स्वच्छ भारत अभियानात दुष्काळानंतरच्याच एका वर्षात विक्रमी कामगिरी करत सर्वाधिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले आहे. जिल्हा प्रशासनाने  एखादी बाब मनावर घेतली, तर काय घडू शकते हे दाखवून दिले आहे. शेतकर्यांची सर्व तूर खरेदी झालीच पाहिजे. पण त्यात व्यापार्यांची तूर खरेदी होणार नाही याची  दक्षता घ्या. मे अखेरपर्यंत तुरीची खरेदी करा. पण त्यानंतर मोठ्या प्रमाणात झालेल्या खरेदीची सर्वंकष चौकशी करा. काटे वाढवा, मनुष्यबळ वाढवा, दोन  पाळ्यांमध्ये खरेदी करा. एकतीस मे पर्यंत तूर खरेदी झालीच पाहिजे याकडे लक्ष द्या. एकतीस मे नंतर, खरेदीची पडताळणी करा. पेरणीचे क्षेत्र आणि उत्पादनाची  पडताळणी करताना, जास्तीत जास्त दहा टक्क्यांची सूट द्या. पण त्यावरही दोषी आढळतील, त्यांना तुरुंगात पाठवा. उदगीर, निलंगा, देवणीमध्ये तूर खरेदी सुरु करा,  थकलेले पैसे दहा दिवसांत दिले पाहिजेत, यासाठी नाफेडकडे पाठपुरावा करा, अशाही सूचना यावेळी श्री. फडणवीस यांनी दिल्या.