Breaking News

कर्जाला कंटाळून दोन सख्या शेतकरी भावांची आत्महत्या

सातारा, दि. 04 - कर्जाला कंटाळून दोन सख्ख्या भावानी आत्महत्या केल्याची घटना रात्री सातार्‍यातील वडगाव हवेली येथे घडली. विशेष म्हणजे हे दोघेही शेतकरी उच्च शिक्षित होते. शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी त्यांनी बँकांकडून कर्ज काढलं होतं. पण बँकांचा कर्जवसूलीचा ताण सहन न झाल्याने, या दोघांनीही आत्महत्या केली.
कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथील जगन्नाथ शिंदे आणि विजय शिंदे या उच्च शिक्षित असलेल्या शेतकर्‍यांनी शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी कराडमधील दोन बँकांकडून एकूण 60 लाख रुपयांचे कर्ज घेतल होतं. मात्र शेती आणि व्यवसायातील तोटयामुळे चव्हाण कुटुंब गेली अनेक दिवस अडचणीत होतं. तसेच मार्च एन्डिंगमुळे कर्जवसूलीसाठी बॅकेकडून तगादा वाढला होता. कर्ज वसूलीचा वाढता ताण सहन न झाल्याने विजय चव्हाण यांनी विदयानगर कराड येथे विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना वडगाव येथे मोठे बंधू जगन्नाथ चव्हाण यांना समजल्यानंतर त्यांनीही कराड ओगलेवाडी रेल्वे रुळावर आत्महत्या केली. जगन्नाथ आणि विजय या दोघांनाही प्रत्येकी दोन मुले आहेत. रात्री उशिरा या दोघांच्याही आत्महत्येचं वृत्त समजल्यानंतर कराड तालुक्यात खळबळ उडाली. विजय यांनी बीएसस्सी अ‍ॅग्रीमधून शिक्षण पूर्ण केलं होतं. विजय आणि जग्गनाथ हे दोघेही बंधू गेल्या तीन वर्षांपासून कडेगाव एमआयडीसीमध्ये सरकीपासून तेल निर्मितीचा व्यवसाय करीत होते. गेल्या वर्षांपासून कंपनी तोटयात गेल्याने ते अडचणीत होते. त्यातच मार्च एन्डिंगमुळे बॅकांकडूनही कर्जवसूलीचा तगादा सुरु होता. हा ताण सहन न झाल्याने या दोन्ही बंधूंनी आत्महत्या केली. या घटनेनंतर चव्हाण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.