Breaking News

मोदींचे मीठ खाऊन शिवसेनेने कर्जमाफीला ‘जय महाराष्ट्र’ केला : विखे-पाटील

सिंदखेड राजा, दि. 16 - ‘शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेनेने दाखविलेला कळवळा शेवटी ढोंगी सिद्ध झाला आहे. कर्जमाफी मिळेस्तोवर शिवसेना एनडीएच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकेल, अशी अपेक्षा होती. परंतु, त्याऐवजी उद्धव ठाकरे पंतप्रधानांसोबत स्नेहभोजन घेताना दिसून आल्याने मोदींचे मीठ खाऊन शिवसेनेने कर्जमाफीच्या मागणीला ‘जय महाराष्ट्र’ केल्याचे दिसून येते.’ अशी घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यातील विरोधी पक्षांनी काढलेल्या संयुक्त संघर्ष यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याचा प्रारंभ करताना ते बोलत होते. विखे पाटील यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते माजी मंत्री आ. जयंत पाटील आदी उपस्थित होते. ‘शेतकरी पित्याकडे लग्नाला पैसा नाहीत म्हणून लातूर जिल्ह्याच्या भिसे वाघोली या गावातील 21 वर्षीय तरूणीने आत्महत्या करण्याच्या घटनेसाठी त्यांनी सरकारला जाब विचारला. रोज 9-10 शेतकरी आत्महत्या करीत आहेत, त्यांची मुले-बाळेही विहिरीत उड्या घेत आहेत. तरीही राज्याच्या मुर्दाड सरकारला जाग येत नाही, या इतके दुसरे दुर्दैव काय असू शकते?’ असा संतप्त सवाल विखे-पाटील यांनी विचारला.