Breaking News

केजरीवाल यांच्यावर अण्णांनी साधला निशाणा

अहमदनगर दि. 26 - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली महापालिकांच्या निवडणुकीत पराभवावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधलाय. केजरीवाल यांच्या कथनी आणि करनीत फरक पडल्याचा आरोप अण्णांनी केलाय. त्यामुळे ‘आप’ने जनतेचा विश्‍वास गमावल्याचं दावा अण्णांनी केला आहे. ‘आप’ला यश मिळालं नाही हे दुर्दैव आहे. ‘आप’मुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र ‘आप’ची विश्‍वसार्हता कमी झाली आहे, असं अण्णा म्हणाले.
केजरीवाल यांनी सरकारी सवलती घेणार नसल्याचं जाहीर केलं होतं, मात्र सत्तेत आल्यावर गाडी, बंगला, मानधनही घेतलं. सर्वांपेक्षा जास्त पगारवाढ केल्याचंही अण्णांनी म्हटलंय. यावेळी अण्णांनी ‘आप’चा एव्हीएम मशीनच्या आक्षेपाचा दावाही फेटाळलाय. निवडणूक आयोगाच्या आवाहनानंतर दोष का दाखवला नाही, असा सवाल अण्णांनी केला. दिल्लीत जनतेनं जनादेश दिल्यानंतर अरविंदनं दिल्लीचं विकासाचं मॉडेल करणं अपेक्षित होतं. देशानं दिल्ली मॉडेलचं अनुकरण केलं असतं. मात्र सत्ता वाईट असून खुर्चीने बुद्धीत फरक पाडल्याचा आरोप अण्णांनी केलाय. गोवा, पंजाबसह इतर राज्यांऐवजी अरविंदनं दिल्लीवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज होती. मात्र अतीघाई केल्यानं केवळ सत्तेसाठी धडपड असून समाजहित नसल्याचं जनतेच्या लक्षात आल्याचं अण्णांनी म्हटलं आहे.