Breaking News

निळवंडे धरणातून 32 गाव पाणी पुरवठा योजना अखेर कार्यान्वित

। अकोले/प्रतिनिधी । 29 - निळवंडे धरणातून अकोले शहर व 32 गावांसाठीच्या महाकाय पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले होते. या योजनेचे पाणी अकोले व 32 गावांना कधी मिळणार, याची उत्सुकता सर्वत्र होती. परंतु काल गुरुवारी रात्री अकोले शहराच्या पाणीपुरवठा करणार्‍या जलकुंभामध्ये हे पाणी अखेर आल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. फटाके वाजून शहरवासीयांनी आनंद व्यक्त केला. ही चाचणी यशस्वी झाली आहे.
तालुक्याचे लोकप्रतिनिधी आ. वैभवराव पिचड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी यासाठी आग्रह धरला होता. जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, असाका संचालक मिनानाथ पांडे, नगरसेवक विजय सारडा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंना एन. व्ही. कुलकर्णी, शाखा अभियंता एम. पी. बिन्नर, मेगा कंपनीचे मॅनेजर संदीप मंडलिक, अकोले व 32 गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष संपतराव नाईकवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल रात्री शाहूनगर परिसरातील अकोले नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभात हे पाणी सोडण्यात आले. यावेळी शहरवासीयांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या प्रयत्नातून तब्बल 40 कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली होती. अकोले शहर व 32 गावांसाठीची लोकवर्गणीही पिचड यांनी त्यावेळी माफ करून आणली होती. आघाडी सरकारच्या काळात या योजनेच्या कामाला गती देण्यात आली. मात्र गेल्या अडीच वर्षांपासून या कामाची गती मंदावली होती. परंतु आ. वैभवराव पिचड यांनी यासाठी पाठपुरावा करून ही योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले. तत्कालीन उपमुख्यमंत्री आ. अजीत पवार यांच्या हस्ते या योजनेचे भूमिपूजन करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत धरणस्थळावर जलशुद्धीकरण प्रकल्प असून पाणी शुद्ध करून ते गावांना दिले जाणार आहे. तिथे सुमारे साडेअकरा लाख लिटरची 20 मीटर उंचीची टाकी आहे. निळवंडे धरणापासून कळसपर्यंत 14 किमी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. याची चाचणी काल करण्यात आली. ती यशस्वी झाल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.