Breaking News

1 मेपासून पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीकपात

पुणे, दि. 17 - पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणारे मावळातील पवना धऱण गेल्या पावसाळ्यात तुडूंब भरूनही या उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट शहरवासीयांसमोर गेल्यावर्षीप्रमाणे आ वासून उभे राहिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनापासून शहरात दहा टक्के पाणीकपात होण्याची शक्यता असून त्याला पालिकेच्या जबाबदार सूत्रांनी दुजोरा दिला आहे. 
गेल्या पाच वर्षात 35 टक्के वाढलेली लोकसंख्या आणि त्या तुलनेत एकाही लिटरने न वाढलेला जलस्त्रोत दुसरीकडे यावर्षी लवकरच सुरू होऊन कडक झालेला उन्हाळा आणि त्यामुळे पाण्याचे वाढलेले बाष्पीभवन यामुळे ही पाणीकपात नाईलाजाने करावी लागणार आहे.
पवनात सध्या 142 टक्के पाणीसाठा आहे.तो शहराला जुलैअखेर पुरेल असा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा अंदाज आहे. मात्र, पाण्याचा गैरवापर, त्याबाबत नागरिकांचा निष्काळजीपणा, वाढते बाष्पीभवन व येत्या पावसाळ्यावरील ’अल निनो’चा प्रभाव यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून पाणीबचतीचे महत्व पटवून देण्यासाठी व पाण्याची काटकसर करीत योग्य तेवढाच वापर व्हावा या उद्देशातून ही पाणीकपात केली जाणार आहे.
तुलनेने शुध्द हवा-पाण्यामुळे उद्योगनगरीत निवासाकडे सगळ्यांचा कल वाढू लागला आहे. त्यामुळे दरवर्षी शहराची लोकसंख्या सात टक्यांनी वाढत आहे. त्यामुळेच 2011 मध्ये लोकसंख्या आता 22 लाख झाली आहे. परिणामी मुलभूत सुविधांवर मोठा ताण पडू लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून असून वाढत्या लोकसंख्येला पाणी  कमी पडू लागले आहे. त्यात दोन वर्षापूर्वीच्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे गेल्या वर्षी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिकेवर आली होती. सुदैवाने गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे पवना भरले. त्यामुळे यावेळच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार नाही, असे वाटत होते. पण यावेळी उन्हाळा लवकरच जाणवू लागला असून त्यामुळे पाणीवापर वाढला आहे. दुसरीकडे उन्हाच्या दाहकतेमुळे पाण्याचे बाष्पीभवनही वाढू लागले आहे
वाढती लोकसंख्या, पाण्याचे वाढते बाष्पीभवन अशी उलट स्थिती असताना गेल्या पाच वर्षात एका लीटरच्याही पाणीस्त्रोताची वाढ झालेली नाही. बाष्पीभवनाबरोबरच पाण्याची गळती आणि चोरीही रोखणारा बंद जलवाहिनी प्रकल्प तडीस नेण्याची नितांत गरज आहे. त्याजोडीने आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्याच्या योजनेलाही गती द्यावी लागणार आहे.