Breaking News

एप्रिल पासून वीज कर्मचार्‍यांसाठी मुदतपूर्व सेवानिवृत्ती योजना लागू

लातूर (प्रतिनिधी), दि. 29 -  महावितरणच्या वर्ग 3 आणि 4 च्या लाईन फोरमन, मुख्य तंत्रज्ञ, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ इत्यादी पदांना दि. 1 एप्रिल 2017 पासून मुदतपूर्व सेवानिवृत्तीयोजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचार्‍याच्या वयाची 45 वर्ष पूर्ण होणे आवशयक आहे. ही योजना राज्याचे ऊर्जामंत्री ना. श्री चंद्रशेखर बावनकुळे व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
जे तारमार्ग कर्मचारी आपली दैंनदिन कर्तव्य आजारपण, अपघात इत्यादी कारणांमुळे पार पाडू शकत नाहीत अशा वर्ग-3 व 4 च्या  संवर्गासाठी मुदतपूर्व सेवानिवृत्ती योजना लागू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वर्ग-3 मध्ये मोडत असलेल्या कर्मचार्‍यांची वयोमर्यादा 45 वर्ष पूर्ण आणि 53 वर्षापर्यंत असणे आणि वर्ग-4 साठी 45 वर्ष पूर्ण 55 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
या योजनेत पात्र होण्यासाठी  दैंनदिन कामे सुरळीत पार पाडू शकत नाही  अशा आशयाचे सिव्हील सर्जनचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे. जे कर्मचारी मुदतपूर्व सेवानिवृत्ती त्यांच्या पाल्यासाठी ‘ विदयुत सहायक ’ पदावरील विकल्प शाबुत ठेवून घेत आहेत, त्यानी त्यांच्या पाल्याची शैक्षणिक माहीती देणेही गरजेचे आहे. यासाठी पाल्य 10 वी, 12 वी उत्तीर्ण असणे अथवा 10 वी , 12 वी नंतर ईलेक्ट्रीकल अथवा वायरमनचा आयटीआय कोर्स महाराष्ट्र राज्य व्यावसायिक परीक्षा मंडळांतर्गत उत्तीर्ण असणे आवशयक आहे.
जे कर्मचारी आपल्या ‘पाल्याना नोकरीचा विकल्प’ न ठेवता या योजनेचा लाभ घेवू इच्छितात, त्यांना या योजनेनुसार सेवा झालेल्या प्रत्येक वर्षासाठी 35 दिवसाचा पगार आणि विहित सेवानिवृत्तीपूर्वी राहिलेल्या प्रत्येक वर्षासाठी 25 दिवसांचा पगार अशा सुत्रानुसार एकूण लाभ मिळणार आहे. हा लाभ एकूण जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंतच मिळणार आहे.
कर्मचार्‍यांनी पाल्यांना ‘विदयुत सहायक’ पदावरील नोकरीचा विकल्प शाबुत ठेवून या योजनेचा लाभ घेतल्यास, ज्यांचे पाल्य 10 वी व 12 वी उत्तीर्ण आहेत त्यांना तीन वर्षात ईलेक्ट्रीकल किंवा वायरमनचा आयटीआय कोर्स उत्तीर्ण अथवा समतुल्य शैक्षणिक अर्हता धारण करावयाची आहे. या कालावधीत त्यांनी कंपनीचे करावयाचे नसून फक्त त्यांनी त्यांची कार्यालयीन कामकाजाच्या दिवसाची हजेरी संबंधित विभाग किंवा उपविभागीय कार्यालयात दयावयाची आहे.
अशा उमेदवारांना सुरुवातीला तीन वर्षाच्या कंत्राटाच्या कालावधीसाठी रु. 7500असे प्रतिमहा एकत्रित वेतन मिळणार आहे. शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर त्यांना ‘ विदयुत सहायक ’ या पदावर नेमण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना तीन वर्षाच्या कालावधीकरिता रु. 7500, दुसर्‍या वर्षासाठी रु. 8500 आणि तिसर्‍या वर्षासाठी रु. 9500 असे एकत्रित वेतन मिळणार आहे. त्यांना जागेच्या उपलब्धतेनुसार ‘ तंत्रज्ञ ’ या पदावर नोकरीत सामावून घेण्यात येणार आहे. परंतु, या पाल्यांनी त्यांची शैक्षणिक अर्हता व त्यांची ‘ विदयुत सहायक ’ पदावरील कंत्राटी सेवा, महावितरणच्या नियम व अटीस आधीन राहून पूर्ण करावयाची आहे.
जे पाल्य तीन वर्षाच्या कालावधीत ईलेक्ट्रीकल अथवा वायरमनचा आयटीआय कोर्स महाराष्ट्र राज्य व्यावसायिक परीक्षा मंडळांतर्गत उत्तीर्ण करु शकले नाहीत  तर त्यांना दिलेले एकत्रित वेतन या योजनेनुसार मिळणार्‍या एकूण रक्कमेतून वजा करुन उर्वरित रक्कम संबंधित कर्मचार्‍यास अदा करण्यात येईल. या रक्कमेवर व्याज देण्यात येणार नाही, अथवा सदर कर्मचार्‍यास पुन्हा नोकरीत सामावून घेण्यात येणार नाही.
जे पाल्य 10 वी, 12 वी अधिक ईलेक्ट्रीकल अथवा वायरमनचा आयटीआय कोर्स महाराष्ट्र राज्य व्यावसायिक परीक्षा मंडळांतर्गत उत्तीर्ण केलेले आहेत त्यांना ‘ विदयुत सहायक ’ या पदावरील कंत्राटाच्या कालावधीत पहिल्यावर्षी प्रतिमहा रु. 7500, दुसर्‍या वर्षासाठी रु. 8500 आणि तिसर्‍या वर्षासाठी रु. 9500 एकत्रित वेतन मिळणार आहे. अशा उमेदवारांना जागेच्या उपलब्धतेनुसार ‘ तंत्रज्ञ ’ या पदावर सामावून घेण्यात येणार आहे. कर्मचार्‍यांच्या पाल्याच्या नोकरीसाठी या योजनेत वयोमर्यादा 18 ते 27 वर्ष ( मागास उमेदवारासाठी 5 वर्ष शिथील) अशी असून या योजनेचा लाभ दि. 1 एप्रिल 2017 पासून दि. 30 सप्टेंबर 2017 पर्यंतच घेता येणार आहे.