Breaking News

विजयाचे दुःख नाही पण पारदर्शकता सोकावेल हो!

दि. 26, फेब्रुवारी - भारतीय जनता पक्षाला स्थानिक संस्थांच्या निवडणूकीमध्ये घवघवीत यश मिळाले .हे यश इतके पारदर्शक आहे की निकालापुर्वीच मंडळींना बंदीस्त ईलेक्ट्रानिक वोटींग मशीन मध्ये काय दडले आहे हे स्पष्टपणे दिसत होते. महाराष्ट्राचे हे अहोभाग्यच म्हणायला हवे की एव्हढी निखळ पारदर्शकता जपणारे ,काळाच्या पोटात दडलेले  अचूकआरपार हेरणारी नजर असणारे,खरे तेच भविष्य वर्तविणारे विद्वान नेतृत्व मिळाले.अर्थात अशी पाञता जन्मजातच येते.ग्रहतारे, राहुकेतू सोबत शनीदेवाचा अभ्यास करून वश करण्याचे सारे तंञ उपजतच अवगत असल्याने , आणि त्याहीपेक्षा सृष्टीचा जन्मदाता ,सृष्टीचा कर्ता,सृष्टी नियंञक ज्यांच्या ईशार्याबर हुकुम तुमच्या आमच्या आयुष्याची दैनंदिनी नियंञीत करतो त्यांच्यासाठी इव्हीएम मशीनच्या आत काय आहे हे समजून घेणे विशेष ते काय ! आता हेच पहा ना! भारदर्शक जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या रावसाहेबांनी महाराष्ट्रातील दहा पैकी सहा महापालिकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळेल असे ज्योतिष सांगितले होते. निकाल आपल्या समोर आहे.
या मंडळींच्या पारदर्शक आणि बौध्दिक पाञतेचा पुरावाच हवा असेल तर मतमोजणीची दुपार आठवा. शिवसेना 95 जागांवर आघाडीवर तर मिञपक्ष 73वर.माध्यम  प्रतिनिधींनी भाजपा प्रवक्ताला छेडल्यानंतर मिळालेली प्रतिक्रीया दोन तासानंतरचा चमत्कार आधीच सांगत होती.दोन तासानंतर प्रवक्त्याच्या शब्दाप्रमाणेच जागांची  अदलाबदल झाली.
पुणे महापालिकेतही हाच चमत्कार. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात 92 जागा मिळवून बहुमत नाहीतर राजकीय संन्यास अशी काकड आरतीच पारदर्शक पणे  खासदाराने गायली होती.
काकड आरती फळली अन् 96 जागा मिळाल्या. किती प्रचंड आत्मविश्‍वास!  अखेर विजय ,विजयच असतो.तो नाकारता येत नाही.प्रश्‍न विजयाचा नाही,पण  पारदर्शकता सोकावण्याची भिती माञ आहे. ही पारदर्शकता याच वेगाने सोकावत राहीली तर निवडणूक आयोगच काय लोकशाहीच्या बुरख्याआड असलेल्या  प्रजासत्ताक चेहर्याची स्वायत्तताच जाहीर लिलावात निघण्याचा दिवस फार दुर  नाही. या देशात,या राज्यात लोकसत्तेची मान्यता असलेले अनेक लोकनेते होऊन  गेले.समाजकारण राजकारणावर एकहाती भक्कम पकड असलेले ,लोकमानसचा गाढा अभ्यास असलेले तज्ञ होऊन गेले.आजही आहेत, त्यांनाही जो चमत्कार  करता आला नाही किंबहूना वर्तविलेले भाकीत साध्य-सिध्द करता आले नाही त्याच  भुमीवर या पारदर्शकतेने घडवून आणले. धन्य ती पारदर्शकता!