Breaking News

क्रांती विरांगणा हौसाताईंचे योगदान मोलाचे ः खा. संभाजी राजे

सांगली, दि. 03 - क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन खासदार संभाजीराज छत्रपती यांनी केले.  क्रांतिसिंह नाना पाटील सभागृहात क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांचा तुफान सेनेच्यावतीने 21 व्या शतकातील कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मान करण्यात  आला. ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे अध्यक्षस्थानी होते.
श्री. कोकाटे म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. ते केवळ जिल्ह्यापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी राज्याचे नेतृत्व केले.  हौसाताई पाटील यांनी भारतीय स्वातंत्र्यलढा, गोवामुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी संघर्ष केला. तुफान सेनेत महिलांचे नेतृत्व केले. दुष्काळी  भागातील शेतीच्या पाणी योजनासाठी केलेला संघर्ष यासाठी योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या योगदानाचा विचार झाला पाहिजे. तीन वर्षे दुष्काळ पाण्यामुळे होता.  परंतु यावर्षीचा दुष्काळ हा मोदी सरकारमुळे पडला आहे. पैशासाठी रांगेत मृत्यूमुखी पडलेल्या 100 लोकांच्या मृत्यूला मोदी सरकारच जबाबदार आहे.
अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी प्रास्ताविक केले. तुफान सेनेचे अध्यक्ष संतोष गायधणी, अ‍ॅड. सुभाष पाटील, अ‍ॅड. सुभाष पवार, अ‍ॅड. नानासाहेब पाटील, इंद्रजित  पाटील, शंकरराव पाटील यांच्यासह विद्यार्थी व नागरिक उपस्थित होेते. विजय महिंद यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. नानासाहेब पाटील यांनी आभार मानले.
क्रांतिसिंह नाना पाटील यांना भारत सरकारने भारतरत्न, तर महाराष्ट्र सरकारने हौसाताई पाटील यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार द्यावा, तसेच हौसाताईंचा धडा  क्रमिक पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा, अशी मागणी आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारकडे पाठपुरावा करावा, असे श्रीमंत कोकाटे यांनी  सांगितले.