Breaking News

शेतकर्‍यांना पायाभूत सुविधा देण्यास शासन कटीबध्द : ना. खोत

सातारा, दि. 3 (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतकर्‍यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यास शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन कृषी  व फलोत्पादन व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
ओंड, ता. कराड येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते झाले. त्यानंतर  आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार विलासराव पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेश पाटील, सहकारी संस्थेचे उपनिबंधक  डॉ. महेंद्र चव्हाण, सरपंच बी. टी. थोरात, उपसरपंच प्रकाश थोरात, राजाराम थोरात, सर्जेराव थोरात, वसंत जगदाळे, हरीभाऊ शेवाळे, रावसाहेब शिंदे यावेळी  उपस्थित होते.
नाबार्डने शेतकर्‍यांना थेट कर्ज सोसायट्यांना दिल्यास कर्ज वितरणाची सुलभ प्रक्रिया निर्माण होईल, असे सांगून खोत म्हणाले, 186 कोटी ठिबक योजनेसाठी  मंजूर केले आहेत. त्याचे वाटप जानेवारी महिनाअखेर करण्यात येणार आहे. ऊसाचे क्षेत्र शंभर टक्के ठिबक खाली आणण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात  प्रयत्न करण्यात येत आहेत. कांदाचाळीची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नाशिक जिल्ह्यासाठी कांदाचाळ उभारण्यासाठी 11 कोटी मंजूर करण्यात आले  आहे.नॅशनल बँकेत शेतकर्‍यांना कर्जासाठी अडचणी येतात. ग्रामीण भागातील विकास सोसायट्यांमुळे शेतकर्‍यांना सुलभ पध्दतीने कर्ज मिळते. शेतकर्‍यांच्या  आर्थिक उन्नतीत सोसायट्यांचा मोठा वाटा आहे. सोसायट्यांमार्फत शेतकर्‍यांना अल्प व दीर्घ मुदतीचे अल्प व्याजदरात कर्ज दिले जाते.
थोरात म्हणाले, सोसायट्यांच्या कर्ज वितरण प्रणालीत सुधारणा कराव्या लागणार आहे, कॅशलेस व्यवहार होत आहेत. सोसायट्यामधील कर्मचार्‍यांनी संगणकाचे  प्रशिक्षण घेतले पाहिजे. 15 लाख मेट्रीक टन कांदा साठविण्यासाठी 5 वर्षात मोठ्या प्रमाणात कांदाचाळी निर्माण करण्यात येणार आहेत. शेतकर्‍यांच्या आर्थिक  उन्नतीसाठी त्यांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी शासन कटीबध्द आहे, असेही त्यांनी सांगितले.
माजी आमदार विलासराव पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील सहकारी संस्था शेतकर्‍यांचा आर्थिक कणा आहे. ज्या गावातील विकास सोसायटीचे काम सक्षम आणि  पारदर्शक आहे. अशा गावातील शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती झाली आहे. सोसायट्यांमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. सहकारामध्ये विश्‍वासाची  भूमिका महत्वाची आहे. सहकार चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली पाहिजे. आपला देश तरुणांचा आहे. तरुणांनी पुढे येऊन कामे केली पाहिजे, अशी  अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.