बोटीसह सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलिस व महसूल विभागाची कारवाई
। श्रीगोंद्यात सहा वाळू तस्कर ताब्यात घेतल्याने खळबळ
अहमदनगर, दि. 30 - श्रीगोंदा पोलिस व महसूल विभागाने वाळू तस्करांवर कारवाई करून सतरा लाख, पन्नास हजार रुपयांच्या मुद्देमालासह सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही करावाई दि. 27 रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास तालुक्यातील पेडगाव (मावळे शिवार) येथील भिमानदीपात्रात करण्यात आली. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.याबाबतची माहिती अशी की, श्रीगोंद्याचे तहसीलदर यांना काल दि. 27 रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास सुमारास पेडगाव शिवारातील भिमानदीपात्रात अवैध वाळूउपसा होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पो. ठाणयाचे पो. उपनिरीक्षक भारत मोरे,पोकॉ. संदीप दरवडे, पोना. डी. आर. पठारे, पोकॉ. दादासाहेब टाके, पोकॉ. संतोष कराळे यांच्यासह महसूलच्या पथकाने पेडगाव येथील भिमानदीपात्रात रात्री छापा टाकला असता, तेथे काही लोक नदीत ट्रेलरमधून एक फायबर बोट उतरवत होते. या वेळी पोलिस व महसूलच्या पथकाने त्यांना वाळूउपसा करण्याचा परवाना आहे का, असे विचारले असता, त्यांच्याकडे परवाना नसल्यामुळे पोलिसांनी एमएम 04 डीके 8451 हा 14 लाख रुपये किमतीचा ट्रेलर तसेच तीन लाख, 50 हजार रुपये किमतीच्या फायबर बोटीसह संतोष आजिनाथ लांभोर (वय 38), रा. आनंदवाडी, बाळासाहेब मारुती साबळे (45), रा. तांदळी, ता. शिरूर, शशिकांत बबन मांगडे (वय 23), रा. काष्टी, मैदुले मुस्तफ शेख (वय 25), रा. काष्टी, मंगलू रजाक शेख (वय 26), रा. काष्टी, यासेन जहागीर शेख यांना ताब्यात घेण्यात आले. तर बोटीचा मालक राजू गावडे रा. काष्टी हा फरार आहे. याप्रकरणी अजनूज गावचे तलाठी परमेश्वर दामोदर बुरकूल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पो. ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.