Breaking News

मनुष्य श्रीमंती धनाने नव्हे तर उच्च ध्येय व विचाराने ठरतो

अहमदनगर, दि. 02 - मनुष्याची श्रीमंती धनाने नव्हे तर उच्च ध्येय व विचाराने ठरते. ज्याच्याकडे ध्येय नाही तो सर्वात गरिब मनुष्य आहे. वेळेच्या नियोजनानेच  प्रगती साधता येत असून, विद्यार्थ्यांनी वेळेच्या नियोजनाची सवय लावणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वेळ घालवण्यासाठी न करता ज्ञान  मिळवण्यासाठी करावा. मुलांच्या शिक्षणासाठी केलेला खर्च ही पुढील भविष्याची गुंतवणूक असल्याचे प्रतिपादन कॉस्मो एमसीई सोसायटीच्या उपाध्यक्षा आबेदा  इनामदार यांनी केले. तसेच मुलगा व मुलगी भेद न करता त्यांना उच्च शिक्षित करण्याचे आवाहन त्यांनी केले. इकरा  एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलित  पी.ए. इनामदार शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात इनामदार बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेरच्या नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई  तांबे, स्नेहालयाचे संस्थापक गिरीश कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष अब्दुल रहिम खोकर, उपाध्यक्ष इंजी. इकबाल सय्यद, सचिव विकार काझी, खजिनदार डॉ.खालिद  शेख, के.के. खान, प्राचार्य जे.एफ. खान, उपप्राचार्या फरहाना शेख, समन्वयक सौ.खान आदि व्यासपिठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य जे.एफ. खान यांनी अहवाल वाचन करुन शाळेच्या वाढत्या गुणवत्तेचा आलेख सादर केला. तसेच क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धा  परिक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणवत्तेची माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत उपप्राचार्या फरहाना शेख यांनी केले.अब्दुल रहिम खोकर म्हणाले की, शिक्षणाशिवाय  मोठे होणे अशक्य आहे. मुलांच्या सर्वांगीन विकासासाठी पालकांचा सहभाग महत्त्वाचा असून, शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानही देणे महत्त्वाचे  असल्याचे त्यांनी सांगितले. उत्कृष्ट शिक्षण देण्यामध्ये पी.ए. इनामदार शाळेचा नांवलौकिक आहे. मुस्लिम समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आनण्यासाठी  संस्थेचे मोठे योगदान असल्याचे गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, मुलीच्या शिक्षणाने दोन कुटुंब संस्कारित होतात. विविध उच्च पदावर  मुली आपले कर्तृत्व सिध्द करत असून, पालकांनी त्यांच्या पखांना शिक्षणाच्या माध्यमातून बळ देणे गरजेचे असल्याचे सांगितले.