Breaking News

ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचे निधन

नाशिक, दि. 29 - ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक वसंत पळशीकर यांचे निधन झाले. नाशिकमधील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून ते अर्धांगवायूने आजारी होते.
महाराष्ट्राच्या वैचारिक प्रांतात अत्यंत आदरणीय असे व्यक्तीमत्त्व म्हणून वसंत पळशीकरांची ओळख होती. महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत त्यांचे योगदान माठे आहे. लोकशाही, समाजवाद, मार्क्सवाद इत्यादी विचारधारांची त्यांनी सखोल अभ्यासपूर्ण नव्याने मांडणी केली. शाहू-फुले-आंबेडकरी विचारांवरील त्यांचे विश्‍लेषणही महत्त्वाचे मानले जाते.
गेल्याच वर्षी वसंत पळशीकरांना शब्द पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ‘परिवर्तन विचार : चिंतन आणि चिकित्सा’ या त्यांच्या पुस्तकाला ‘शब्द’चा दुर्गा भागवत पुरस्कार देण्यात आला होता. ‘परिवर्तन विचार : चिंतन आणि चिकित्सा’, ‘जमातवाद’, ‘धर्म, धर्मश्रद्धा आणि अंधश्रद्धा’ इत्यादी वसंत पळशीकरांनी लिहिलेली, तर ‘चौकटीबाहेरचे चिंतन - निवडक वसंत पळशीकर’, ‘जिहाद गुलाल आणि सारीपाट’ ही त्यांची लेखन संपादित केलेली पुस्तके महाराष्ट्राच्या वैचारिक प्रांतात प्रसिद्ध आहेत. वसंत पळशीकर यांच्या निधनामुळे तटस्थपणे विचार करायला लावणारा आणि विविध विचारधारांची वेगळ्या दृष्टीने मांडणी करणारा विचारवंत महाराष्ट्राने गमावला.