Breaking News

खडसे ’आउट’; मंत्रिपदावरून पायउतार

निवृत्त न्यायाधीशांमार्फत आरोपांची चौकशी

मुंबई, दि. 05 - गेल्या काही दिवसांपासून विविध आरोपांच्या गर्तेत सापडलेले राज्याचे महसूलमंत्री आणि भाजपचे राज्यातील वजनदार नेते एकनाथ खडसे यांना  अखेर आज मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. खडसे यांनी शनिवारी सकाळी राजीनामा सादर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो मंजुरीसाठी  राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे
पाठविला आणि रात्री उशिरा तो स्वीकारण्यात आला. खडसेंवरील आरोपांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी होणार  आहे.
राज्यात आक्टोबर 2014 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या 19 महिन्यांत मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढवलेले  एकनाथ खडसे हे पहिले मंत्री ठरले आहेत. खडसेंचा राजीनामा घेऊन भाजपने पक्ष आणि सरकारची प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सर्वांत ज्येष्ठ आणि शिष्टाचारानुसार दुसर्‍या क्रमांकाचे मंत्री; तसेच महसूल खात्यासह तब्बल डजनभर खाती सांभाळणार्‍या एकनाथ  खडसे यांच्यावर गेल्या तीन आठवड्यांपासून आरोपांच्या फैरी झडत होत्या. निकटवर्ती गजानन पाटीलचे 30 कोटींच्या लाचेचे प्रकरण, पुण्यातील वादग्रस्त जमीन  खरेदी, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमसोबतचे कथित संभाषण, सिंचन गैरव्यवहाराच्या पैशातून मुक्ताई कारखान्याची खरेदी, कोट्यवधी रुपयांची हप्तेबाजी आदी  आरोपांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्यामुळे खडसे यांना मंत्रिपदावरून दूर करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सूचनेवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज एकनाथ खडसे यांना दूरध्वनी केला. तुमच्यावर होत असलेल्या  आरोपांमुळे पक्ष आणि सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होत आहे. आता अधिक बदनामी होऊ नये म्हणून राजीनामा द्या, असे गडकरींनी खडसेंना सांगितल्याचे  समजते. त्यानुसार एकनाथ खडसे यांनी आज सकाळी सव्वाअकरा वाजता ‘वर्षा’वर जाऊन फडणवीस यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या वेळी अर्थमंत्री  सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.
विरोधी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी खडसे यांना गैरव्यवहारांच्या आरोपांवरून लक्ष्य करत त्यांच्या  राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी या मागणीसाठी राज्यपालांची भेट घेतली होती, तर दमानिया यांनी खडसेंवर कारवाई व्हावी,  यासाठी आमरण उपोषण आंदोलन सुरू केले. याशिवाय प्रसारमाध्यमांमधून खडसेंवरील आरोपांची चर्चा सुरू झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी याची गांभीर्याने दखल घेतली.
अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबतचा अहवाल मागविला होता. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही परदेश दौर्‍यावर रवाना होण्यापूर्वी  फडणवीस यांना बोलावून चर्चा केली होती. विधान परिषद निवडणूक तोंडावर असल्याने खडसेंचा राजीनामा लांबणीवर पडला होता. मात्र, कालच विधान  परिषदेसाठी सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सर्व चक्रे फिरली आणि त्यानंतर केंद्रीय नेतृत्वाने खडसे यांना पदमुक्त करण्याचा निर्णय घेतल्याचे  समजते. त्यानुसार खडसे यांनी आज राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री विनोद तावडे, प्रकाश  मेहता, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित खडसे माध्यमांना सामोरे गेले.