Breaking News

ऑरेंज कॅप कोहलीकडेच राहणार?

बेंगळुरू, 29 -  शानदार नेतृत्वक्षमतेच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) संघाला आयपीएलच्या नवव्या सत्रात अंतिम फेरी गाठून देणारा स्टार फलंदाज  विराट कोहली ऑरेंज कॅपचा मानकरी ठरण्यासाठी आता केवळ औपचारिकता शिल्लक आहे. विराट आत आयपीएलच्या एका मोसमात एक हजार धावा  फटकावण्याचा विक्रम नोंदवण्यास उत्सुक आहे.
आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा फटकावणार्‍या फलंदाजाला मिळणार्‍या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट 919 धावांसह सर्वांत आघाडीवर आहे.  विराटनंतर दुसर्‍या क्रमांकावर असलेला सनराझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे. वॉर्नरने आतापर्यंत 779 धावा फटकावल्या आहे. तो विराटपेक्षा 140  धावांनी पिछाडीवर आहे. रविवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळल्या जाणार्‍या अंतिम लढतीत या दोन्ही फलंदाजांचा खेळ बघण्याची संधी मिळणार आहे.
विराट यंदा टी-20 क्रिकेटमध्ये शानदार फॉर्मात आहे. त्याने आयपीएलमध्येही कामगिरीत सातत्य राखले. विराटने 15 सामन्यांत 83.54 च्या सरासरीने आणि  151.90 च्या स्ट्राईक रेटने 919 धावा फटकावल्या आहेत. त्यात चार शतके व सहा अर्धशतकांचा समावेश आहे.
विराट अंतिम लढतीत 81 धावा फटकावत आयपीएलच्या इतिहासात एका पर्वात एक हजार धावा फटकावणारा जगातील पहिला फलंदाज म्हणून विक्रम  नोंदवण्यास उत्सुक आहे तर वॉर्नर त्याला पिछाडीवर सोडत ऑरेंज कॅपचा मान मिळवण्यास प्रयत्नशील आहे. काही चमत्कार घडला तरच वॉर्नरला ही कॅप  पटकावता येईल. कारण विराट शून्यावर बाद झाला तरी त्याला पिछाडीवर सोडण्यासाठी वॉर्नरला 141 धावांची खेळी करावी लागेल आणि सध्याच्या घडीला हे  शक्य वाटत नाही. वॉर्नरने 16 सामन्यांत 59.92 च्या सरासरीने आणि 149.23 च्या स्ट्राईक रेटने 779 धावा फटकावल्या आहेत. त्यात आठ अर्धशतकी खेळींचा  समावेश आहे. सर्वाधिक धावा फटकावणार्‍या फलंदाजांच्या यादीत बेंगळुरूचा आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलियर्स तिसर्‍या क्रमांकावर आहेत. त्याने 15 सामन्यांत  56.83 च्या सरासरीने 682 धावा फटकावल्या आहेत. आयपीएलच्या नवव्या पर्वात अंतिम लढतीत विराट गृहमैदानावर खेळणार असल्यामुळे त्याचे पारडे वरचढ  भासत आहे. चिन्नास्वामी मैदानावर विराटचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित असतील. दरम्यान, हैदराबादचा कर्णधार वॉर्नरने यंदाच्या मोसमात स्वत:ला सिद्ध केले  असून संघाला अंतिम फेरी गाठून दिली. उभय संघांनी प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे जेतेपद पटकावून देण्याची उभय संघांच्या कर्णधारांवर मोठी  जबाबदारी आहे.