यंदाची आषाढी वारी करणार निर्मल करण्यासाठी ‘नमामि चंद्रभागा’ अभियान राबविणार !
सोलापूर, दि. 24 - चंद्रभागा ही महाराष्ट्राच्या निखळ, निरागस श्रद्धेचा मानबिंदू आहे. वारकरी आणि चंद्रभागा यांचे अतूट नाते आहे. चंद्रभागेच्या पावित्र्याचे आणि निर्मळतेचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन ‘नमामि चंद्रभागा अभियान’ लोकसहभागातून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर येणारी आषाढी वारी ही अधिक निर्मल करणार असल्याची ग्वाही वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
पंढरपूर वारीमार्गावरील सर्व मुक्कामांच्या ठिकाणी स्वच्छतागृहे, रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करण्याबाबत वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस आमदार मेधा कुलकर्णी, सेवा सहयोग फाउंडेशनचे नरेंद्र वैशंपायन, चंद्रशेखर कुलकर्णी, संदीप जाधव, अतुल नागरस, देहू संस्थानचे माजी अध्यक्ष शिवाजीराव मोरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
लोणी आणि यवतमध्ये गेल्यावर्षी पथदर्शी स्वरूपात स्वच्छ आणि निर्मळ वारीचा प्रकल्प राबविण्यात आला होता. या प्रकल्पाला मिळालेले यश लक्षात घेऊन हा प्रकल्प आता दोन्ही पालखी मार्गांवरील सर्व पालखीतळासाठी राबविण्याच्या सूचना श्री. मुनगंटीवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुण्याच्या विभागीय आयुक्तांना दिल्या. हा पथदर्शी प्रकल्प यशस्वीपणे राबविणारे माजी खासदार प्रदीप रावत, देहू संस्थानचे माजी अध्यक्ष शिवाजीराव मोरे आणि सेवा सहयोग फाउंडेशनचे सी. आर. कुलकर्णी या अशासकीय सदस्यांना विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीस निमंत्रित करावे, स्वच्छ आणि निर्मळ वारीसंदर्भातील त्यांचा अनुभव आणि मते जाणून घ्यावीत व यासंबंधीचा अहवाल येत्या 15 दिवसांत शासनाकडे सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.