महाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता खालावली - पुरुषोत्तम भापकर
बीड, 11 -देशपातळीवर गुणवत्तेत नंबर एकवर असलेला महाराष्ट्राचा नंबर कधी 32 व्या, तर कधी 33 व्या क्रमांकावर लागत आहे. दहाच्या पुढेच महाराष्ट्राचा गुणवत्तेत क्रमांक लागत असल्याचे प्रथम संस्थेच्या अहवालावरून समोर आले आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी बीड येथे दिली.
बीड येथील स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठान आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ‘ज्ञानरचनावाद : ज्ञानयुगातील शिक्षण पद्धती’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. या वेळी भापकर बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत गांभीर्याने घेऊन राज्याला गुणवत्तेत अग्रेसर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुढील शैक्षणिक धोरण आखण्यात आले. एकही मूल शिक्षणात अप्रगत राहणार नाही यासाठी तीन ते चार वेळेस शाळ्याबाह्यांचे सर्वेक्षण केले. महाराष्ट्रात ऊसतोड पाल्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर हंगामी वसतिगृहाच्या माध्यमातून रोखण्यात आले. यातही विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार नव्याने काही बदल करण्यात आले आहेत. तसेच यंदा नव्याने शिक्षण हमी कार्ड’ची सोय तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित होणार्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आली आहे. यात पालक ज्या ठिकाणी काम करत आहेत. त्या ठिकाणच्या शाळेत पाल्याला शिक्षण देण्यात येत आहे. काम पूर्ण झाल्यावर तो परत आहे त्या शाळेत हमी कार्ड’ जमा करून पुढील शिक्षण घेऊ शकतोे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नसून तो शाळाबाह्य होण्यापासून वाचणार आहे. या सोबतच विविध उपक्रम राबवून राज्याची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यात येत आहे.
आनंददायी गुणवत्तेची चळवळ राज्यात सुरू झाली असून मराठवाड्यातील औरंगाबादसह बीड, जालना, परभणी व हिंगोली हे पाच जिल्हे मी दत्तक घेतले आहेत. या जिल्ह्यांना महिन्यातून एक दिवस भेट देऊन शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करणार आहे, असे शिक्षण आयुक्त
पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.