Breaking News

कांगारुंनी 3-0 ने मालिका जिंकली - ऑस्ट्रेलियाचा 3 गडी आणि 7 चेंडू राखून विजय


मेलबर्न, 17 - मॅक्सवेलने 82 चेंडूंत 96 धावा ठोकत निर्णायक खेळी केल्याने काही वेळ सामना भारताच्या बाजूने झुकला आहे असे वाटत असतानाच पुन्हा कांगारुंचे पारडे जड झाले. आणि ऑस्ट्रेलियाने सलग तिसर्‍या सामन्यात भारताच्या जवळपास त्रिशतकी धावसंख्येचे आव्हान सहज पार करीत मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियाने 3 गडी आणि 7 चेंडू राखून विजय मिळविला. त्यामुळे 47 षटके झाली असताना ऑस्ट्रेलियाला 18 चेंडूंत 16 धावा आवश्यक होत्या.
तत्पूर्वी, भारताचा भरवशाचा फलंदाज विराट कोहलीची शानदार शतकी खेळी आणि शिखर धवन, अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकांमुळे भारताला ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात 296 धावांचे आव्हान ठेवता आले. पहिल्या दोन्ही सामन्यांत तिनशेहून अधिक धावसंख्या करूनही भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता या धावसंख्येची भारतीय गोलंदाज पाठराखण करु शकतील की नाही हा प्रश्‍न आहे. 
पहिल्या दोन्ही सामन्यांत शतकी खेळी करणारा रोहित शर्मा तिसर्‍या सामन्यात अपयशी ठरला. त्याला रिचर्डसनने अवघ्या 6 धावांवर बाद केले. यानंतर आलेल्या विराट कोहलीने आपला फॉर्म कायम ठेवत शिखर धवनच्या साथीने संघाची धावसंख्या वाढविली. या दोघांनी शतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना आणखी यश मिळू दिले नाही. दोघेही अर्धशतक झळकावून मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असतानाच धवन 68 धावांवर हेस्टिंगचा शिकार ठरला. फटकेबाजीच्या प्रयत्नात तो त्रिफळाबाद झाला. मात्र, कोहलीने आपला खेळ कायम ठेवताना रहाणेच्या साथीने भारताची धावसंख्या दोनशेच्या पार नेली. रहाणेनेही त्याला चांगली साथ दिली. अखेर कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीतील 24 वे शतक साजरे केले. त्याने 6 चौकार आणि 1 षटाकाराच्या साहाय्याने 105 चेंडूत शतक पूर्ण केले. रहाणे 54 चेंडूत सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, तो अर्धशतकानंतर उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. कोहलीने शतकानंतर झटपट धावा जमाविण्यास सुरवात केली. पण, तो 117 धावांवर बेलीकडे झेल देऊन बाद झाला. कर्णधार धोनीच्या 9 चेंडूत 23 धावांच्या खेळीमुळे भारताला तिनशे धावांच्या जवळ जाता आले. अखेर निर्धारित 50 षटकांत भारताने 6 गड्यांच्या मोबदल्यात 295 धावा केल्या.