Breaking News

दरड कोसळून 5 अमरनाथ यात्रेकरूंचा मृत्यू

श्रीनगर : अमरनाथमध्ये दरड कोसळल्याने बालटाल भागातील बराडी मार्गावर पाच भाविकांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. खराब वातावरणामुळे यंदा अमरनाथ यात्रेतील भक्तांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालटाल बालटालमध्ये कोसळलेल्या दरडीमुळे ही दुर्घटना घडली. ज्या पाच जणांचा मृत्यू झाला त्यात चार पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या तसेच जखमी झालेल्या व्यक्तींची ओळख अजूनपर्यंत होऊ शकलेली नाही. मृतदेहांना बालटाल रुग्णालयात नेण्यात आले असून पोलीस, सुरक्षा एजन्सी आणि वैद्यकीय टीम सुरक्षेसंदर्भात पूर्णपणे तयार आहे. 40 दिवस चालणारी ही यात्रा येत्या 26 ऑगस्टला संपेल. सुरक्षा अधिकार्‍यांनी सांगितले की, आतापर्यंत 1.96 लाख भाविकांनी यात्रेत सहभाग घेतला आहे. यावेळी अमरनाथला जाणार्‍या वाहनांमध्ये रेडिओ फ्रीक्वेंसी टॅगचा उपयोग केला जाणार आहे. याशिवाय सीआरपीएफचे जवानही सुरक्षेसाठी सक्रीय असणार आहेत. यावेळच्या अमरनाथ यात्रेमध्ये बेस कॅम्प, मंदिरं, रेल्वे स्थानक, बस स्टॅण्ड आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या सर्व सुरक्षेसोबतच यात्रेकरूंची प्रीपेड मोबाईल नंबरची सेवा आधी सात दिवसांची होती. पण आता ती वाढवून 10 दिवसांची करण्यात आली आहे.