Breaking News

अपहृत मुलींचा तपास लावा : मागणी

राहुरी तालुका प्रतिनिधी : तालुक्यातील मौजे तांदूळनेर येथील अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा त्वरित तपास लावावा, यासाठी येथील आधारवेल फाऊंडेशनच्यावतीने निवेदन पोलिसांना नुकतेच निवेदन देण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरु असून लवकरच सर्व बाबींचा उलगडा होईल, असे आश्वासन पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी निवेदनकर्त्यांना दिले.

तालुक्यातील मौजे तांदूळनेर येथील आदिवासी समाजातील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण होऊन आठवडा उलटला. परंतु अद्यापही त्यांच्या ठावठिकाणाचा तपास लागलेला नाही. यासाठी लवकरात लवकर तपास लावण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी आधारवेल फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली नान्नोर, अपहरण झालेल्या मुलींचे पालक, नातेवाईक व तांदूळनेर ग्रामस्थ उपस्थित होते. या दोन्हीही मुली आठ दिवसांपूर्वी पहाटे तीनच्या सुमारास राहत्या घरातून रहस्यमयरित्या गायब झाल्या आहेत. सदर मुलींच्या पालक व नातेवाईकांनी सर्वत्र चौकशी व शोध घेतला. परंतु कुठेही शोध लागलेला नाही. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु अद्यापपर्यंत सदर मुलींचा तपास लागलेला नाही. त्यामुळे या मुलींचा काही घातपात झाला की काय, अशी शंका मुलींचे पालक व नातेवाईकांकडून व्यक्त केली जात आहे.