Breaking News

युवा शक्ती हीच खरी राष्ट्रशक्ती -अण्णा हजारे

युवा शक्ती हीच खरी राष्ट्रशक्ती आहे. स्वातंत्र्याचा खरा आनंद उपभोगायचा असेल तर, तरुणांनी निर्भीडपणे स्वातंत्र्याच्या दुसर्‍या लढाईत, व्यवस्था परिवर्तनाच्या नव्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

अण्णा हजारे यांच्या 80 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या, व्यवस्था परिवर्तनाच्या नव्या चळवळींचा प्रारंभ अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत पारनेर महाविद्यालयात
करण्यात आला. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कार्यकारिणी सदस्य व पंचायत समितीचे सभापती राहूल झावरे, पत्रकार संजय वाघमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, लाभेश औटी, सुरेश पठारे, दत्ता आवारी, दादा पठारे, रामदास घावटे, शरद पवळे, पत्रकार मार्तंड बुचुडे, विनोद गोळे, उदय शेरकर, सनी सोनावळे, तुषार औटी, बबन कवाद, अनिल नांगरे, मच्छींद्र उचाळे, धीरज महांडुळे, रामदास कवडे आदी उपस्थीत होते.
यावेळी अण्णा हजारे म्हणाले की, सामान्य जनतेला पावलो पावली अडवणूक सहन करावी लागत आहे. भ्रष्टाचाराचा सामना करावा लागत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे उलटली, मात्र देशातील जनतेला स्वातंत्र्याचा खरा आनंद उपभोगता येत नाही, ही शोकांतीका आहे. देशातील ही परिस्थीती बदलण्यासाठी तरुणांनी पुढे येणे आवश्यक आहे. तरुणांनी आपापल्या गावात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे संघटन उभारल्यास तालुक्यातील संघटीत कार्यकर्त्यांना राळेगण सिध्दी येथे आंदोलनाचे प्रशिक्षण दिले जाईल. गाव पातळीपासून देशपातळीपर्यंत शिस्तबध्द पध्दतीने संघटना बांधणीचे काम सुरु आहे.संघटना बांधणीचे काम पूर्ण झाल्यावर तालुका पातळीवर दीड ते दोन हजार, जिल्हा पातळीवर सुमारे पंधरा ते वीस हजार तर, राज्य पातळीवर सुमारे सहा लाख प्रशिक्षीत कार्यकर्त्यांची फौज उभी राहील. या संघटीत कार्यकर्त्यांनी गाव, तालुका, जिल्हा, राज्यपातळीवर एखादा प्रश्‍न हाती घेतल्यावर प्रशासनास, सत्ताधार्‍यांस दखल घ्यावीच लागेल. प्रश्‍न मार्गी लागतील असा विश्‍वास अण्णा हजारे यांनी व्यक्त केला.
सध्याची पक्षीय निवडणूक पध्दत घटनाबाह्य असून घटनेतील कलम 84 परिच्छेद ख आणि ग नुसार भारतीय नागरीक असलेल्या व्यक्तीस निवडणूक लढवता येईल असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.राजकीय पक्षांमार्फत निवडणूक लढवण्याबाबत घटनेत तरतूद नाही, त्यामुळे आज सुरू असलेली निवडणूक पध्दत चुकीची असल्याचे अण्णांनी सांगितले. ही पध्दत बदलावी, निवडणूक लढवण्यासाठी राजकीय पक्षांना बंदी घालावी, मतदान यंत्रावरील निवडणूक चिन्ह हटवून त्याऐवजी स्वतंत्र (अपक्ष) रितीने निवडणूक लढवणार्‍या उमेदवाराचे छायाचित्र असावे. यासाठी आपण गेल्या सहा वर्षांपासून निवडणूक आयोगाशी संघर्ष करीत असल्याचे हजारे यांनी सांगीतले.
या वेळी बोलताना राहूल झावरे म्हणाले की, अण्णांनी राजकीय पक्षांविरोधात भूमीका घेतली असली तरी, तालुक्यातील सर्वच पुढारी सर्व प्रथम अण्णांचे सेवक, कार्यकर्ते आहेत. आमच्यासाठी राजकीय भूमीका दुसर्‍या, तिसर्‍या स्थानावर आहेत. आम्ही अण्णांच्या आंदोलनात नेहमीच सहभागी होत आहोत, यापुढेही आंदोलनात अग्रभागी राहू अशी ग्वाही झावरे यांनी दिली.
यावेळी झावरे यांची संस्थेच्या कार्यकारीणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल तसेच डॉ. रंगनाथ आहेर यांना सावित्रीबाई फुले विद्यापिठाने सर्वोत्कृष्ट प्राचार्य म्हणून गौरवल्या बद्दल अण्णा हजारे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत राहूल झावरे यांनी, तर संजय वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. हरेश शेत्रके यांनी सूत्रसंचालन केले.