जळगांव अमानुष मारहाण प्रकरणाचा आरपीआयकडून निषेध
सुपा / प्रतिनिधी
पारनेर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) व बहुजन क्रांती मोर्चा यांच्या वतीने जळगांव येथील वाकडी ता. जामनेर गावातील मातंग समाजातील अल्पवयीन मुलांना नग्न करुन अमानुष मारहाण करणार्यायांवर कठोर कारवाई होण्याच्या मागणी साठी आर.पी. आय तालुकाध्यक्ष अमित जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये भाजपा सरकारच्या कारकिर्दीत फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचारधारेला काळीमा फासण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण हे सरकारच जाणीवपुर्वक जातीय व धार्मिक तेढ निर्माण करत आहे. त्यातुनच दलित आदिवासी, अल्पसंख्यांक समाजावरील अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे.
त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे, जळगांव जिल्हयातील वाकोडीची घटना होय. केवळ जातीय द्वेषातून पोहण्यासाठी गेलेल्या, मुलांपैकी इतरांना सोडून मातंग समाजाच्या मुलांना विहीर बाटवली म्हणुन, नग्न करुन अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेचा आम्ही पारनेर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व बहुजन क्रांती मोर्चा, पुरोगामी चळवळीतील सर्व पक्ष, समविचारी संघटनाच्या वतीने घटनेचा तीव्र निषेध करत आहे. निवेदनावर आरपीआय तालुकाध्यक्ष अमित जाधव, सामाजिक कार्येकर्ते मधुकर पठारे, संपत पवार, गणेश उमाप, ऋत्विक गायकवाड, अतुल भालेराव, शब्बीर शेख, संपत वैरागर, सुधीर सोनवणे, प्रकाश नगरे, गणेश घोत्रे आदींच्या सह्या आहेत.
