Breaking News

अहिल्यादेवींना जातीत बांधू नका : सुमित्रा महाजन धनगर आरक्षणावरून घोषणाबाजी करत गोंधळ

केवळ पुण्यतिथी, जयंतीसाठी चौडी या पावनभुमीत न येता अहिल्याबाईंच्या पराक्रम, चारित्र्य, विचारांचा आदर्श घ्यावा. आहिल्याबाई समस्त समाजाला व राज्यकर्त्यांना आपल्या न्याय व सर्वसमावेशक राज्यकारभारामुळे आदर्शवत असल्याचे प्रतिपादन लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन केले. 


जामखेड तालुक्यातील राजमाता आहिल्याबाईंच्या चौंडी या जन्मगावी 293 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सुमित्रा महाजन प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री गणपतराव देशमुख उपस्थित होते. तसेच यावेळी, आ. शिवाजी कर्डिले, आ. बाळासाहेब मूरकूटे, माजी मंत्री आण्णा डांगे, खा. विकास महात्मे, आ. नारायण पाटील, आ. भिमराव धोंडे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, मा. मंत्री बबन पाचपुते, भगवान मूरूमकर, रवी सूरवसे, कर्जतच्या नगराध्यक्षा संगिता भैलूमे, मा. नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्यासह राज्यभरातून समाजबांधव उपस्थितीत होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे म्हणाले की, सोलापूर विद्यापीठास अहिल्यादेवींचे नाव देणारच आहे. तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत पाठपुरावा चालू आहे. समाजाच्या हिताचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मी सभागृहात सातत्याने प्रयत्नरत असल्याचे सांगत असतानाच सभेमध्ये आरक्षण-आरक्षण असे गोंधळ घालत काही दूसर्‍या गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. डॉ. इंद्रकुमार भिसेसह 30-40 गोधळ करणारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस गाडीतून गोधळींना घेऊन जात असताना काही जणांनी पोलिस गाड्यांवर दगडफेक केली, यात पोलिस कर्मचारी आण्णा पवार हे जखमी झाले. 
धनगर आरक्षणाच्या वादातून चौंडीत गोंधळ झाला आहे, भाजप सरकार सत्तेत येवून 3 वर्ष झाल्यानंतरही धनगर आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्याने त्याचे जोरदार पडसाद आजच्या आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उमटले. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याच समोर हा सर्व प्रकार घडला. यावेळी धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी काही कार्यकर्त्यांनी घोषणा देत गोंधळ घातला. गोंधळ करणार्‍या 30-40 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिस प्रशासनाचा हलगर्जीपणा 
अहिल्यादेवींची जयंती चौंडीलाच साजरी करणार, प्रसंगी जेलमध्ये बसण्याची तयारी आहे, असे ठणकावून सांगणार्‍या बहुजन समता परिषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे यांना पोलिसांनी 149 प्रमाणे नोटीस बजावली होती, तसेच जिल्हा बंदीचा आदेश दिला असतांना, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतांना कार्यक्रमाच्या स्टेजच्या अगदी 50 फूटावर कार्यकर्त्यांसह आले. ना. राम शिंदे यांचे भाषण सुरू असतानाच आरक्षण संबंधी घोषणा दिल्या, कार्यक्रमात गोंधळ उडवला गेला, यावरून लोकसभेच्या सभापतींच्या कार्यक्रमात पोलिसांच्या बंदोबस्ताबाबतचा हलगर्जीपणा समोर आला आहे. 

कार्यक्रमाला नियोजित वेळेपेक्षा फार उशीर झाला, अशा वेळी सूरवातीलाच काही दूसर्‍या गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळाला सुरुवात केली, तेव्हा सभापती सुमित्रा महाजन यांनी स्वतः माईक हाती घेऊन शांत राहण्याचे आवाहन केले. हा कार्यक्रम पक्षाचा किंवा राजकीय नाही, आहिल्याबाईंच्या विचारांचा आहे, तेव्हा कोणी ओरडू नका, गोंधळ घालू नका असे सभापतींनी आवाहन केले.