असे मरावे की मरणाचाही उत्सव व्हावा : सत्यपाल महाराज
कोपरगाव शहर प्रतिनिधी
देशाच्या सीमेवर सध्या प्रचंड घमासान सुरू आहे. देशाच्या संरक्षणासाठी खरे तर युवकांची आज नितांत गरज आहे. मात्र आजचा युवक वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाकडे वळलेला आहे. देशासाठी रक्त वाहन्या ऐवजी मद्यप्राशन करण्यातच युवक आपले आयुष्य वाया घालवित आहेत. त्यामुळे ज्यांना जगण्याचा मोह आहे, त्यांनी मरणाचा अर्थ समजून घ्यावा. असे मरावे, की मरणाचा उत्सव व्हावा, असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार आणि प्रसिद्ध कीर्तनकार सत्यपाल महाराज यांनी केले.
तालुक्यातील संवस्तर येथे गोदावरी खोरे नामदेवराव परजणे तालूका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक नामदेवराव परजणे यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘व्यसनमुक्ती आजच्या काळाची गरज’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे होत्या.
यावेळी जंगली महाराज आश्रमाचे देवानंद महाराज, गोदावरीचे संचालक राजेंद्र जाधव, कृष्णराव परजणे, पुष्पा काळे, पं. स. सभापती अनुसया होन, पाथरे आश्रमाचे दामोदर पंजाबी, संवत्सर आश्रमाचे नितीन महानुभव यांची प्रमुख उपविधी होती. प्रारंभी स्व. नामदेवराव परजणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सत्यपाल महाराज यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. जि. प. सदस्य राजेश परजने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमास वसंतराव आव्हाड, वसंतराव वैराळ नामदेव गुडघे, सोपानराव घुले, रोहिदास होन, राजेंद्र लहारे, अनिल कदम, शबाना शेख यांच्यासह गोदावरी दूध संघाचे संचालक ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सुयोग चिंधे यांनी केले. उपसरपंच विवेक परजणे यांनी आभार मानले
