Breaking News

शेतकऱ्यांनी फळे व भाजीपाल्यासाठी कीटकनाशके, हार्मोन्सचा अनावश्यक वापर टाळावा


मुंबई : राज्यातील शेतकरी बांधवांनी फळे, भाजीपाल्यावर अनावश्यक कीटकनाशके आणि हार्मोन्सचा। वापर टाळावा, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज केले. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून आलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्र्यांनी हे आवाहन केले आहे.

यासंदर्भात कृषिमंत्री म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील जांभळी गावातून हिरवी मिरची निर्यात केली जाते. अलीकडे या निर्यात केल्या जाणाऱ्या हिरव्या मिरचीचे नमुने घेतले असता त्यात 'फेंप्रोपॅथीन'कीटकनाशकाचा अंश अधिक प्रमाणात दिसून आल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवाना आवाहन करताना कृषिमंत्री यांनी सांगितले की, फळ व भाजीपाल्यावर'ऑक्सिटोसीन' सारखे हार्मोन्स आणि 'मोनोक्रोटोफोस' सारख्या कीटकनाशकांचा अनावश्यक वापर करू नये. याच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होतो आणि कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर राज्यातील निर्यातक्षम फळे, भाजीपाला यांचा योग्य दर्जा राखणे आवश्यक आहे, अन्यथा आयात करणाऱ्या देशांकडून प्रतिबंध लादले जातात, असेही श्री. फुंडकर यांनी सांगितले.