Breaking News

देशभरात चलनतुटवडा

नवी दिल्ली : पंतप्रधानांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात पैशांची चणचण निर्माण झाली होती. तशीच काहीशी परिस्थिती मंगळवारी देशभरात बघायला मिळत आहे. एटीएममध्ये पैशांचा खडखडाट असल्याने पैसे काढण्यासाठी बँकांच्या बाहेर रांग लावावी लागत आहे. आता पुन्हा नोटाबंदीमध्ये जी परिस्थिती होती त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसते आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगाना,मध्य प्रदेश या राज्यांमध्ये लोकांनी गरजेपेक्षा जास्त रोकड काढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे बँकांचे म्हणणे आहे.

काही राज्यात नकदीची मागणी वाढल्याने आणि योग्य वितरण न झाल्याने हा प्रकार झाल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले. देशातल्या अनेक राज्यांमध्ये एटीएममध्ये कॅशच उपलब्ध नाही. गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र, तेलंगणा या राज्यांना सर्वाधिक फटका बसला. या चलनतुटवडयाचा सर्वात जास्त त्रास शेतकरी आणि छोट्या व्यापार्‍यांना होत आहे. कारण त्यांना खरेदी-विक्री करायला कॅशची आवश्यकता असते. पण रिझर्व बँकेनं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही भागांमध्ये तर 8 ते 9 एटीएम फिरल्यावर कुठेतरी कॅश काढता येत होती.
राजधानी दिल्लीत देखील नागरिकांना चलन तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. गुडगाव येथे 80 टक्के एटीएममध्ये पैसे नसल्याचे समोर आले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नोटाबंदीनंतर 5 लाख कोटी रुपयांच्या 2 हजारच्या नोटा चलनात आणल्या होत्या. या नोटा चलनात आल्यामुळे चलन तुटवड्याचा प्रश्‍न बर्‍याच प्रमाणात कमी झाला होता. पण हे संकट आता पुन्हा एकदा निर्माण झाले आहे. काही बँकांच्या मते चलन जमा करण्याच्या सवयीमुळे हा तुटवडा निर्माण झाला आहे. 
रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार 6 एप्रिल रोजी 18.2 लाख कोटी रुपये चलनात होते. ही आकडेवारी नोटाबंदीच्या आधी बाजारात असलेल्या चलना इतकी होती. देशात आवश्यक प्रमाणात चलन उपलब्ध आहे. नोटाबंदीनंतर सरकारने डिजिटल व्यवहारांना अधिक प्रोत्साहन दिल्यामुळे प्रत्यक्षात चलनाची मागणी कमी झाली होती. पण आता निर्माण झालेल्या चलन टंचाईमुळे काळजी वाढली आहे. जेव्हा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात मार्च महिन्यात चलन तुटवड्याच्या बातम्या आल्या होत्या. पण तेव्हा याकडे फार गां भिर्याने घेतले गेले नाही.