Breaking News

शहर पोलिसांनी पुन्हा पकडले चारशे किलो गोमांस!


संगमनेर/प्रतिनिधी - शहर पोलिसांची अवैध कत्तलखान्यावर कारवाईचे सत्र पुन्हा एकदा सुरु केले आहे. मागील आठवड्यात १ लाख रुपये किंमतीच्या गोमांसासह ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. तर गेल्या रविवारी {दि. १५} रात्री नऊच्या सुमारास येथील कत्तलखान्यातून मुंबईच्या दिशेने एका वाहनातून ४०० किलो गोमांस नेले जात असताना शहर पोलिसांनी पकडले.

या कत्तलखान्यातून मुंबईच्या दिशेने एका वाहनातून गोमांस नेले जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक पंकज निकम यांनी रायतेवाडी फाटा येथे लावलेल्या सापळ्यात हे वाहन अलगद अडकले. साडेआठ वाजता टोयोटा कंपनीच्या इटीएस (एम. एच. ०२ ई एच ०६५९) हे वाहन पोलिसांच्या टप्प्यात येताच त्यांनी ते अडविले. सदर वाहनांची तपासणी केली असता त्यात ४०० किलो गोमांस आढळून आले. पोलिसांनी सदरचे वाहन आणि चालक अब्दूल करिम खालीद शेख (वय ३९ रा. मुंबई) आणि गोमांसाचा मालक एजाज जलील कुरेशी (वय २८, रा. रहेमतनगर) या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीविराेधात पो. कॉ. सुभाष बोडखे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. संगमनेरात सुरु असलेल्या कत्तलखान्यात राजरोसपणे गोहत्या सुरु आहेत. पोलिसांनी वारंवार कारवाया करुनदेखील हे कत्तलखाने सुरुच आहेत. यात मोठ्या प्रमाणात ‘अर्थ’कारण होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. शहर पोलिस ठाण्याचा पदभार गोकूळ आैताडे यांनी स्विकारल्यानंतर कत्तलखान्यावरील कारवाया पूर्णत: थांबल्या होत्या. परंतु आता पुन्हा कत्तलखाने नव्याने कार्यरत होऊन डोके वर काढत असल्याचे या कारवाईवरून दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर गोमातेला वाचविण्यासाठी युवकांनी रस्त्यावर उतरण्याची गरज निर्माण झाली आहे.