Breaking News

शेतमालास हमीभाव मिळाल्यास आत्महत्या थांबण्यास मदत : अण्णा हजारे


शेतकर्‍यांना दीडपट हमी भाव देण्याचे लेखी आश्‍वासन पंतप्रधान कार्यालयाच्या मंत्र्यांनी दिले आहे. शेतमालाला हमी भाव मिळाला तर त्याचे परिणाम हळू हळू दिसू लागतील. पुढील काळात शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबण्यास मदत होईल, असा आशावाद ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला.
 
नवी दिल्ली येथे रामलिला मैदानावर सात दिवसांच्या उपोषणानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे काल राळेगण सिद्धी येथे दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांनी पारंपारिक पद्धतीने जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यावेळी अण्णांनी संत यादवबाबा यांचे दर्शन घेतले. त्यानंतर, ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. 
राळेगण सिद्धीकडे येताना पुणे विमानतळ, वाघोली, रांजणगाव गणपती, वाडेगव्हाण येथेही नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. सरपंच रोहिणी गाजरे, माजी सरपंच मंगल मापारी, सीमा औटी, कौशल्या हजारे, शैला भालेकर, रेखा पठारे, रेखा औटी, हिराबाई पोटे, निर्मला आवारी या महिलांनी अण्णांचे महिलांनी औक्षण केले.

 ग्रामस्थांशी संवाद साधताना अण्णा म्हणाले की, रामलीला मैदानावरील आंदोलनाला पाठिंबा म्हणून राळेगण सिद्धी परिवाराने सात दिवस वेगवेगळे उपक्रम राबवून साथ दिली. त्यामुळे मला आंदोलनासाठी मोठी उर्जा मिळाली. एका गावाची ताकद काय असते, हे राळेगण सिद्धीने भारत सरकारला दाखवून दिले. शेतात राब राब राबणार्‍या शेतकर्‍यांच्या पिकाला मोबदला मिळत नसल्याने आत्महत्या वाढल्या. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळाला तर या आत्महत्या थांबतील. दुधालाही चांगला भाव मिळायला हवा, असेही ते म्हणाले. अण्णांंनी दिवसभर संत यादवबाबा मंदिरात विश्रांती घेतली. सायंकाळी ग्रामसभेत विजयोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे उपसरपंच लाभेष औटी यांनी सांगीतले. या वेळी माजी सरपंच जयसिंग मापारी, आदर्श पतसंस्थेचे संचालक रमेश औटी, विलास औटी, गणपत पठारे, सुरेश पठारे, दादा पठारे, डॉ. धनंजय पोटे, शरद मापारी, दत्ता आवारी, दादाभाऊ गाजरे, प्राचार्य सोमनाथ वाकचौरे, सुभाष पठारे, अरुण भालेकर, महेंद्र गायकवाड, नाना लंके, गणेश आवारी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.