Breaking News

12 वीचा निकाल वेळेवर !

कनिष्ठ महाविद्यालय महासंघाची व शिक्षणमंत्र्यांची सकारात्मक बैठक 

मुंबई, दि. 11, एप्रिल - बारावीच्या परीक्षेचा निकालाचा मार्ग मोकळा झाल्याने, विद्यार्थ्यी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदोलन स्थगित करण्यात आल्याने पालकांनी व विद्यार्थ्यांनी एकदाचा सुटकेचा श्‍वास घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून नियमित तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डात जमा करण्यात येणार आहेत. कनि×ष्ठ महाविद्यालय महासंघाची बैठक शिक्षणमंत्र्यांसोबत झाली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे. 9 एप्रिल रोजी संध्याकाळी उशिरा शिक्षण मंत्र्यांबरोबर महासंघाची बैठक झाली. बैठकीत मूल्यांकन झालेल्या कायम विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची यादी उद्यापासून ऑन लाइन जाहीर करण्याचा निर्णय घेतला. तसेच पुढील मागण्यांच्या बाबतीत निर्णय झाला असून शासनाने असे पत्रकही संघटनेला दिले, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा.अनिल देशमुख यांनी दिली. दरम्यान, 2012 पासून नियुक्त व ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या सर्व शिक्षकांना तातडीने नियुक्तीची मान्यता देण्यात येईल. तसेच कायम विना अनुदानितची मूल्यांकणास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी ऑन लाइन जाहीर करण्यात येणार आहे. 171 वाढीव पदांवरील शिक्षकांच्या वेतनाच्या तरतुदीसाठी व अर्थ खात्याशी संबंधीत इतर मागण्यांसाठी 17 एप्रिल रोजी अर्थ मंत्र्यांबरोबरच्या संयुक्त बैठकीत निर्णय करणे, आदींवर चर्चा झाली आहे. चर्चेद्वारे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन देण्यात आले. शिक्षण मंत्र्यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून आणि विद्यार्थी हितासाठी महासंघाने आंदोलन स्थगित केले आहे. आजपासून नियामक (मॉडरेटर्स) तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डात जमा करतील. यामुळे बारावीचा निकाल वेळेवर लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती शिक्षक महासंघाचे अध्यक्ष यांनी दिली आहे.