Breaking News

तेलगू देसम’ची भाजपला सोडचिठ्ठी बीजेपी म्हणजे ‘ब्रेक जनता प्रॉमिस’ असल्याची टीका

नवी दिल्ली : आंध्रप्रदेश राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी केलेल्या तेलगू देसम पक्ष (टीडीपी)यांनी शुक्रवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पाठिंबा काढून घेतला. उत्तरप्रदेश आ णि बिहार पोट निवडणुकांत झालेल्या पराभवानंतर तेलगू देसम पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यामुळे मोदी सरकारला पुन्हा एक मोठा झटका बसला आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष टीडीपीने एनडीएचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे आता टीडीपी एनडीएपासून पूर्णपणे वेगळा झाला आहे. याच मुद्याहून आता टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस मोदी सरकारविरुद्ध संसदेत अविश्‍वासाचा प्रस्ताव आणणार आहेत. याला काँग्रेस, एआयएडिएमके आणि डाव्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. हा प्रस्ताव आणण्यासाठी किमान 50 खासदारांचा पाठिंबा असणे आवश्य असते. त्यामुळे आता मोदी सरकारविरुद्ध अविश्‍वासाचा प्रस्ताव येणार हे निश्‍चित झाले आहे. मोदी सरकारच्या कारकिर्दीतील, असा प्रस्ताव येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. 

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्याने टीडीपीमध्ये नाराजी होती, असे सांगण्यात येत आहे. टीडीपीकडे सध्या 16 खासदार आहेत. नायडू यंच्या सांगण्याहून टीडीपीच्या दोन सदस्यांनी गेल्या आठवड्यात 8 मार्चला केंद्रात आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नायडू यांनी म्हटले आहे, की ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमचा संपर्क होऊ शकला नाही.’ आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी मी तब्बल 29 वेळा दिल्लीला जाऊन पत्रकारांशी संवाद साधला. एवढेच नाही, तर मी 29 वेळा पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांचीही भेट घेऊन त्यांना आंध्रला विशेष दर्जा द्यावा, अशी विंनंती केली असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, तेलुगु देसम पक्षाच्या खासदारांनी केंद्र सरकारविरुद्धच्या आपल्या निदर्शनात एका नवीन घोषवाक्याचा वापर केला आहे. त्यांनी वापरलेले हे घोषवाक्य तेलुगु देसम पक्ष एनडीएतून बाहेर पडल्याचे स्पष्टपणे दर्शवते. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा या मुद्यावर टीडीपी नियमितपणे संसदेत निदर्शने केली. यावेळी त्यांनी, ’आम्हाला न्याय हवा, एनडीए तलाक, तलाक, तलाक’ अशी घोषवाक्ये दिली. याच मुद्यावर आज टीडीपी केंद्र सरकारविरुद्ध लोकसभेत अविश्‍वासाचा ठराव आणणार आहे. या ठरावाला आपला पाठिंबा असल्याचे विरोधकांनी जाहीर केले आहे.