Breaking News

प्लास्टिक उद्योजकांना कापडी पिशव्या तयार करण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आवाहन

मुंबई, दि. 20, मार्च - प्लास्टिक पिशव्या तयार करणार्‍या उद्योजकांनी कापडी पिशव्या तयार कराव्यात, असे आवाहन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले.  ते आज प्लास्टिक उद्योजकांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करतांना मंत्रालयात बोलत होते.


कदम म्हणाले की, प्लास्टिक उद्योजकांना त्यांचाकडील शिल्लक असलेल्या प्लास्टिकच्या वस्तू, कॅरीबॅग, पिशव्या नष्ट करण्यासाठी निश्‍चितच काही कालावधी दिला जाईल. त्याचबरोबर कुठलेही प्ल ॅस्टिकचे उत्पादन, कॅरीबॅग निर्माण होणार नाहीत. याची काळजी घेतली पाहिजे. प्लास्टिक उद्योजकांनी याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्याकडे दररोज 1100 टन कचरा निर्माण होतो. त्याची विल्हेवाट कशी लावावी हा मोठा प्रश्‍न आहे. भविष्यात आरोग्याचा मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर प्लास्टिक बंदीला पाठिंबा देऊन समाजामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. अनेक महिला बचतगटांनी कॅरीबॅगला पर्याय म्हणून कापडी पिशव्या बनविणे सुरू केले आहेत. जे उद्योजक कॅरीबॅग तयार करायचे त्यांनी कागदी पिशव्या तयार करण्याकडे वळले पाहिजे. त्यासाठी शासन नक्कीच मदत करेल. राज्यातील प्लास्टिक कारखान्यात काम करणारे जे कामगार असतील व प्लास्टिक बंदी मुळे बेरोजगार होणार असतील तर त्यांचा बाबतीतही योग्य निर्णय घेऊ. अशा कामगारांची यादी प्लास्टिक उद्योजकांनी द्यावी, असेही कदम यांनी शेवटी सांगितले.