Breaking News

‘प्रवरे’च्या भुमिपूत्राचा पहिला काव्यसंग्रह आनंददायी : विखे

आश्वी : प्रतिनिधी - प्रवरा परिसरासारख्या ग्रामीण भागात डॉ. अशोक शिंदे यांनी वैद्यकीय क्षेत्रात मोठे काम केले आहे. येथील शेतकरी, शेतमजूरांच्या व्यथा, वेदना त्यांनी काव्यसंग्रहात शब्दबध्द केल्या आहेत. त्यामुळे प्रवरेच्या मातीतील भुमिपूत्राच्या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करतांना आनंद होत आहे, अशा भावना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केल्या.
तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथे ‘ऊनझळा पानकळा’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी चित्रपट गीतकार व लेखक बाबासाहेब सौदागर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. मेधा काळे, आकाशवाणीचे बाबासाहेब खराडे, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसिलदार साहेबराव सोनवणे, विखे कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे, जिल्हा परिषद सदस्या अॅड. रोहिणी निघुते, प्रकाश उंबरकर, अशोक म्हसे, बाळासाहेब भवर, विनायकराव बालोटे, रिपाइंचे बाळासाहेब गायकवाड, भागवत उंबरकर, भाऊराव कांगुणे, भगवानराव इलग, विलास उंबरकर आदींसह कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विखे म्हणाले, डॉ. शिंदे हे साहित्य निर्मितीची दृष्टी असलेले, ग्रामीण जीवनाशी समरस असलेले प्रतिभासंपन्न कवी आहेत. त्यांच्या ‘ऊनझळा पानकळा’ या काव्यसंग्रहातून आमच्या मनातल्या भावनांची स्पंदने पहायला मिळतात. मात्र आज नवचैतन्य व आत्मविश्वास निर्माण करणारे साहित्य दुर्दैवाने निर्माण होत नाही. 

याप्रसंगी अँड. शाळिग्राम होडगर, गीतकार बाबासाहेब सौदागर, साहित्यिक प्रा. मेधा काळे, रिपाईचे बाळासाहेब गायकवाड व डॉ. अभिजीत शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवागौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. अभिजीत व डॉ. अपर्णा शिंदे यांचा विखेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कवी संमेलनात कवी शिवाजी चाळक, शिवाजी काळे, आनंदा साळवे, यशवंत पुलाटे, डॉ. श्रीकांत औटी आदींसह सुमारे ५० कवींनी कवितांचे सादरीकरण केले.