Breaking News

पोहायला जाताय...? सावधानता बाळगा ! सेल्फी प्रसिद्धीसाठी होतेय स्टंटबाजी ; सुरक्षिततेच्या उपायांची गरज

सर्वत्र उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. त्यामुळे उन्हापासून सुटका करण्यासाठी शाळेतील मुले पोहण्याचा आनंद लुटत आहेत. मात्र, कोणत्याही सुरक्षिततेच्या साधनाशिवाय मुले विहिर, बंधारे, नाले, तलाव अशा ठिकाणी पोहताना दिसत आहेत. त्यामुळे पालकांकडून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

सोशल मीडियावर फोटो प्रसिद्ध करण्याच्या हव्यासापोटी मुले विविध स्टंट करताना दिसत आहे. अशा स्टंटबाजीतून दरवर्षी कित्येक बालकांना, विद्यार्थ्यांना जिवाला मुकावे लागते. त्यामुळे पालक तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
धोकादायक पद्धतीने पोहणे ही गंभीर बाब असून याबाबत सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच वातावरणात बदल होवून दिवसभर उष्णता आणि रात्री थंडी अशी परिस्थिती आहे.त्यानंतर मार्च महिना सुरू झाला आणि दिवस आणि रात्रीसुद्धा हवामानात उष्णता जाणवू लागली. जमिनीतील पाणीसाठे कमी होऊ लागले. पिकांसह पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवू लागली. दुपारी 12 वा. च्यापुढे रस्ते ओस पडू लागले आहेत. उन्हाच्या तीव्रतेने प्रवाशी प्रवास करणे टाळत आहेत. शेतात काम करणारे शेतकरी तसेच महिलाही उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शर्ट, टोपी घालूनच शेतात काम करीत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी जनावरे झाडांच्या सावलीचा आश्रय घेत आहेत. कर्जत तालुक्यात कुकडीचे आवर्तन सुटले असल्यामुळे चार्‍या पाण्याने भरुन वाहत आहेत. लहान मुले पोहण्याच्या मोहापोटी पाण्यात उतरुन धोका संभवू शकतो. शाळा दुपारीच सुटत असल्याने विद्यार्थी मोकळ्या वेळेत पोहण्याचा आनंद घेत आहेत. त्यामुळे पालकांनी त्यांची काळजी घेण्याची गरज आहे.