Breaking News

कोळगावथडीवासियांची तहान भागविल्याशिवाय थांबणार नाही!

कोेपरगांव: श. प्रतिनिधी - तालुक्यातील कोळगांवथडीवासिय महिला भगिनींच्या डोईवरचा हंडा कायमस्वरूपी उतरविण्याचा निर्धार केला आहे. यात कितीही अडथळे आले तरी या गावातील माताभगिनींच्या थेट घरात नळाद्वारे पिण्यांचे पाणी देणार आहोत. यातून कोळगावथडी येथील ग्रामस्थांची कित्येक वर्षांची तहान भागविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही आ. स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत कोळगांवथडी नळ पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावातील अडथळे दूर करून ६० लाख ५ हजार ५५९ रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास आ. कोल्हे यांनी विधिमंडळाची विशेष मंजुरी घेतली. या योजनेचे भूमिपुजन रविवारी मोठ्या थाटामाटात पाट पडले. त्याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या. याप्रसंगी संजीवनीचे उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे, संचालक विलासराव वाबळे, राजेंद्र कोळपे, मोहनराव वाबळे, माहेगांव देशमुखचे सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, एल. डी. पानगव्हाणे, सिताराम पानगव्हाणे, राजेंद्र देशमुख, वसंतराव लकडे, पंचायत समितीचे घुले, वाघ, माजी सरपंच सही शिवाजीराव निंबाळकर, काशिनाथ वाकचौरे, नानासाहेब ढोमसे, भिकचंद लुटे, शामराव मेहेरखांब, प्रशांत वाबळे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्याचप्रमाणे सुरेगांव, माहेगांव देशमुख, कोळपेवाडी, शहाजापूर, वेळापूर आदी पंचक्रोशीतील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी पुंजाजी राऊत यांनी प्रास्तविक केले. ते म्हणाले, की आ. स्नेहलता कोल्हे यांनी गांवासाठी १० लाख रूपये खर्चाचे काम मंजुर केले आहे. याशिवाय प्रत्येक अडीअडचणी सोडविण्यांचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. कोळगांवथडी पाणी पुरवठा योजनेसाठी २ गुंठे जागा देणारे केशवराव जेऊघाले यांचा आ. कोल्हे यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. वसंतराव लकडे व एल. डी. पानगव्हाणे यांची यावेळी भाषणे झाली. 

आ. कोल्हे म्हणाल्या, तालुक्यातील कोळगांवथडी आणि उक्कडगांवच्या पाणीपुरवठा योजना रखडल्या होत्या. त्यातील त्रृटींची पुर्तता करून हा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतः भेटून अंतिम मंजुरी मिळविली. महिलांना पाण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो, याची कल्पना आपल्याला आहे. त्यांचे हे दुःख कमी करण्यासाठीच एक महिला लोकप्रतिनिधी या नात्याने आपण साडेतीन वर्षांत मोठया प्रमाणात पाठपुरावा केला. अनेक विकास योजनांसाठी केंद्र व राज्य शासनांकडून निधी मिळविला आहे. कोळगांवथडीवासियांनी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्याकडे अनेक वेळा शिष्टमंडळे घेऊन पिण्याच्या पाणी योजनेच्या वेदना मांडल्या आहेत. महिला भगिनींच्या डोईवरचा हंडा दूर झाला पाहिजे, यासाठीच ५२ लाख ६४ हजार रूपये खर्चाची निविदा काढण्यात आली. हे काम प्राधान्याने मार्गी लागावे, ही तळमळ मनात होती. या कामाचे भूमिपूजन पार पडल्याचा मनस्वी आनंद आहे. न डगमगता विकासाचा ध्यास घेत काम करीत राहणे आणि त्यातून गोरगरीब, उपेक्षित, दिनदलितांचे अश्रू पुसणे याचाही सार्थ अभिमान आहे. सूत्रसंचालन आणि आभार राजेंद्र मेहेरखांब यांनी केले.