Breaking News

मतदानसक्तीचा विचार करावा : मुख्यमंत्री

मुंबई : कायद्यानुसार राज्यात निवडणूका घेतल्या जातात, मात्र या निवडणूकांमध्ये मतदान सक्तीचे करता येईल का? याबाबत विचार करणे आवश्यक असल्याचे मत शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. राज्य निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या लोकशाही, निवडणूका आणि सुशासन परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्यपाल सी.विद्यासागर, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे.एस. सहारिया आदी उपस्थित होते. 


काही लोक धोरणात्मक बाबींवर नेहमी बोलत असतात. परंतु ते मतदानाला जात नाहीत. मतदान सक्तीचा विचार यासाठी होणे आवश्यक आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणुका घेणे ही दरवर्षीची प्रक्रिया आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित घेता येतील का, याचा विचार करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात बोलताना केली आहे. एकत्रित निवडणुका घेतल्यास निवडणूक आयोग, प्रशासन व पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असं ते म्हणाले. निवडणुकांतील गुन्हेगारीकरण ही गंभीर बाब असून गुन्हेगारी प्रवृत्तीला निवडणूक लढण्यापासून रोखले गेले पाहिजे, असंही ते म्हणाले. निवडणुकांमध्ये पैशाचा अतिरेकी वापर होतो ही चिंतेची बाब आहे. बर्‍याचदा निवडणुकीनंतर काही उमेदवारांकडून प्रति मतदान मी इतके पैसे दिले अशी भाषा कानावर पडते, त्यावेळेस चिंतेत अधिकच भर पडते. पैशाचा हा वापर थांबला पाहिजे. असं मतही त्यांनी व्यक्त केलं.