Breaking News

क्रिकेट सामन्यात पराभव झाल्याने प्रतिस्पर्ध्यांवर हल्ला

ठाणे, दि. 01, फेब्रुवारी - क्रिकेट सामन्यात पराभव झाल्याचा राग मनात धरुन एका अल्पवयीन मुलाने प्रतिस्पर्धी खेळाडूंवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. संदीप तुकाराम म्हात्रे असे गंभीर जखमी झालेल्या खेळाडूचे नाव असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कोनगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


भिवंडी तालुक्यातील सरवली पाडा येथील बाल गोपाल क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या सामन्यामध्ये भादवड येथील त्रिमुर्ती क्रिकेट संघ विरुद्ध रांजणोली क्रिकेट संघ यांच्यात चुरशीचा सामना झाला. या सामन्यात रांजणोली संघ पराभूत झाला. या पराभवाचा राग मनात ठेऊन विवेक भगत, मयूर भगत यांनी अन्य दोन साथीदारांच्या मदतीने प्रतिस्पर्धी संघातील संदीप तुकाराम म्हात्रे याच्यावर बॅटने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.