Breaking News

‘भारत के राजनेता’ पुस्तकातून रामदास आठवले यांचे चरित्र जगासमोर येईल – उपराष्ट्रपती


‘भारत के राजनेता रामदास आठवले’ या पुस्तकाच्या माध्यमातून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे चरित्र जगासमोर येईल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांनी केले.
‘भारत के राजनेता रामदास आठवले’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम कॉन्स्टीट्यूशन क्लबमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. ‘भारत के राजनेता रामदास आठवले’ या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती एम.वैंकय्या नायडु यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पुस्तकाचे संपादक राजीव सुमन उपस्थित होते.

श्री.नायडू म्हणाले, नामवंत चांगल्या व्यक्तींचे व्यक्तीचित्रे पुस्तकांच्या स्वरूपात जगासमोर येणे आवश्यक आहे. अशा पुस्तकांच्या माध्यमातून त्या व्यक्तींचे जीवनातील संघर्ष कळते. त्यावरून प्रेरणा घेता येते. अशी पुस्तके हे भविष्यात महत्त्वपूर्ण दस्तावेज म्हणूनही उपयोगी होतात. ही पुस्तके नेहमीच वाचली जातात.

रामदास आठवले यांचे व्यक्तीमत्व महाराष्ट्रासह देशभर लोकप्रिय आहे. ते अनुसूचित जातीतील असून कधीही संकुचित विचार त्यांनी केलेला नाही. त्यांची सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील वाटचाल अतिशय खडतर आणि संघर्षशील अशीच राहिलेली असूनही त्यांच्या वागण्या-बोलण्यात कधीही असमानता किंवा कटूता दिसली नसल्याचे उपराष्ट्रपती नायडू म्हणाले. या पुस्तकानिमित्त त्यांची जीवन यात्रा सामान्य जनतेपर्यंत पोहोचले.

श्री.आठवले यांनी नेहमीच सामाजिक समतेचा विचार मांडलेला आहे. देशात सामाजिक तेड निर्माण होईल असे वक्तव्य श्री.आठवले यांच्याकडून झाले नसल्याचे कौतुकही श्री.नायडू यांनी यावेळी केले. लोकप्रतिनिधी म्हणून सर्वच वर्गाच्या समस्यांना वेळोवेळी श्री.आठवले यांनी मांडले आहे. त्यांनी लोकसभेत तसेच आता राज्यसभेत अनेक लोकोपयोगी निर्णयात सहभाग नोंदविला असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले. या सर्व घटनांचा उल्लेख या पुस्तकांत केला असल्याचे श्री.नायडू म्हणाले.

‘भारत के राजनेता रामदास आठवले’ या पुस्तकामध्ये रामदास आठवले यांच्या जीवनातील संघर्षाचा 80 ते 90 च्या काळाविषयी उल्लेख केलेला आहे. त्यांची सविस्तर अशी मुलाखत, त्यांनी लोकसभेत राज्यसभेत आणि महाराष्ट्र विधानसभेत दिलेली भाषणे विचारलेले प्रश्नांविषयी या पुस्तकांत उल्लेखित केले आहे.