Breaking News

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणामार्फत पाणी वापराचे सुधारित दर जाहीर


महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पिण्याचे पाणी, शेतीसाठी वापरण्यात येणारे पाणी तसेच उद्योगासाठी व अन्य घटकांसाठी वापरण्यात येणाऱ्या पाणी वापराचे सुधारित दर जाहीर केले असल्याची माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष के.पी.बक्षी यांनी आज दिली. मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नियमन प्राधिकरणाचे सदस्य सर्वश्री डॉ. शिवाजी सांगळे, विनय कुलकर्णी, विनोदकुमार तिवारी उपस्थित होते.
श्री. बक्षी पुढे म्हणाले, पाणी वापराचे सुधारित दर पाणी वापर संस्था, जलतज्ज्ञ, शासनाचे विविध विभाग, अशासकीय संस्था यांच्याबरोबर चर्चा करून ठरविण्यात आले आहेत. प्राधिकरणाने अपेक्षित व्यवस्थापन खर्चाची विभागणी घरगुती पाणी वापर, औद्योगिक पाणी वापर व कृषी पाणी वापरकर्ते यांच्यावर आर्थिक भार पेलण्याची क्षमता, सुलभ उपलब्धता, पाण्याच्या गुणवत्तेवरील परिणाम इत्यादी बाबी विचारात घेऊन पाणीपट्टीचे दर ठरविले आहेत.

घरगुती पाणी वापरासाठी धरणातून पाणी घेणाऱ्या महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतीसाठी पाणी पुरवठ्याचा मानक दर प्रती घनमीटर (1 हजार लिटर) दर अनुक्रमे 25पैसे, 18 पैसे व 15 पैसे इतका राहणार आहे. पाणी वापरावर नियंत्रण येण्यासाठी प्राधिकरणाने पाणी पट्टीसाठी तीन टप्पे केले आहेत. मंजूर पाणी वापराच्या क्षमतेपेक्षा 115 टक्के ते 140 टक्के जास्त पाणी वापरावर मानक दराच्या 1.50 पट दर राहणार आहे. मंजूर पाणी वापराच्या 140टक्क्यापेक्षा पुढील पाणी वापरावर 2.0 पट दर आकारणी होणार आहे