Breaking News

मंत्रालयातील सरपंच दरबारात घुमला 'कर्जत'चा आवाज


कुळधरण/ प्रतिनिधी/- मुंबईच्या मंत्रालयात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भरविलेल्या सरपंच दरबारात कर्जत तालुक्यातील सरपंचांनी विविध प्रश्न मांडत मंत्रालयात कर्जतचा आवाज पोहोचविला.ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे,ग्रामविकास विभागाचे सचिव हासिम गुप्ता यांच्या उपस्थितीत दरबारात महाराष्ट्राच्या विविध भागातील दोनशे पंचवीस सरपंच उपस्थित होते.
कर्जत तालुक्यातील दुरगाव,बजरंगवाडी,म्हाळंगी तसेच कापरेवाडी येथील सरपंचांनी ग्रामविकास मंत्र्यांच्या दरबारात विविध प्रश्न मांडले. दुरगावचे सरपंच अशोकराव जायभाय यांनी अनेक गृप ग्रामपंचायतीत अनेक गावांसाठी एकच ग्रामसेवक असल्याने कामात अडचणी येतात. त्यासाठी 'गाव तेथे ग्रामसेवक' याची अंमलबजावणी करावी. गावातील तलाठी, कृषी साहाय्यक, वायरमन, पोस्ट विभाग ही कार्यालये एकाच इमारतीत असावीत.रोजगाराला चालना मिळण्यासाठी ग्रामविकास विभागाने बीओआय तत्वावर मंजुरी द्यावी हे मुद्दे मांडले. बजरंगवाडीचे सरपंच अंगद रुपनर,म्हाळंगीचे सरपंच महेश जगताप, कापरेवाडीचे सरपंच बबनराव खळगे यांनी ग्रामपंचायतीच्या व्यथा ग्रामविकास मंत्र्यांपुढे मांडल्या.मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व मुद्दे जाणून घेत मार्गदर्शन केले.विभागाचे सचिव हासिम गुप्ता यांनी ग्रामविकास विभागातील कायदेशीर बाजुवर मार्गदर्शन केले.

◾व्हाट्सॲप गृपवर 'कारभारी' एकत्र

दुरगावचे सरपंच अशोकराव जायभाय यांनी व्हाट्सॲपवर सर्वांना एकत्र आणले. ग्रामपंचायतीतील विविध योजना, उपक्रम आदीवर गृपमध्ये चर्चा होते. शासकीय धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपक्रम सुचविले जातात. ग्रामविकासाचे स्पप्न बाळगणाऱ्या सरपंचांसाठी गृप दिशादर्शक ठरत आहे.