Breaking News

खडसे यांनी काढले सरकारचे वाभाडे दुष्काळाच्या मुद्दयावरून सरकारला सुनावले

नागपूर : हिवाळी अधिवेशनात शुक्रवारी पुन्हा एकदा भालपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवरून सरकारला धारेवर धरत जोरदार टीका केली. एकनाथ खडसे पुन्हा एकदा आपल्याच सरकारचे वाभाडे काढताना दिसले. सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात खडसे वारंवार परखड पण पक्षविरोधी भूमिका घेताना दिसले आहेत. 

राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करणार आहात का, असा सवाल यावेळी खडसेंनी सरकारला केला. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड, अमळनेर तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. केंद्र सरकारने घालून दिलेल्या निकषांनुसार राज्यातील एकही गावात दुष्काळ जाहीर होऊ शकत नाही, त्याबद्दलही खडसेंनी नाराजी व्यक्त केली. खडसे म्हणाले, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड, अमळनेर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करा, यासाठी मी यासाठी पहिल्यांदा 4 जुलै रोजी पत्र दिले आहे. तरीही सरकार सांगते तक्रार मिळाली नाही. 

या तीन तालुक्यात 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी आहे. पाणीटंचाई असल्याने मी सप्टेंबरपासून मदत मागतोय, दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करा अशी विनंती केली, पण सरकारने काहीही केले नाही. सरकार मदत करत नाही, लोकांनी मरायचे का? केंद्र सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचे निकष बदलले आहेत, त्या निकषानुसार राज्यातील एकही दुष्काळी गाव बसणार नाही. केंद्र सरकारने तयार केलेले निकष बाजूला ठेवून दुष्काळग्रस्त तालुक्यांना मदत करा असे आवाहन खडसे यांनी केले. 

खडसे यांच्या प्रश्‍नांना उत्तर देतांना महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, केंद्राचे निकष अधिक कडक आहेत. पण यात एकही गाव बसणार नाही असे नाही, आम्ही गोंदिया जिल्ह्यातील 3 तालुक्यात याच निकषावर दुष्काळ जाहीर केला आहे. पण हे निकष बदलावे यासाठी माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे, याबाबत अधिवेशन संपल्यावर दिल्लीला जाऊ. केंद्राच्या निकषानुसार दुष्काळ जाहीर केला नाही तर केंद्र सरकारची मदत मिळणार नाही. ज्या गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी असेल त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे सांगितले.


दुष्काळ निकषांच्या बदलांसाठी प्रयत्न करू : चंद्रकांत पाटीलकेंद्र शासनाने दुष्काळ घोषित करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला आहे. त्यात बदल करुन घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह दिल्लीला जाऊन प्रयत्न करण्यात येतील. मुक्ताईनगर, बोधवड व अंमळनेर तालुक्यातील गावांची पैसेवारी 50 पैशांच्या आत असल्यास जुन्या निकषाप्रमाणे राज्य आपत्ती निवारण निधीतून मदत करण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज, शुक्रवारी विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात सांगितले.