Breaking News

नदीवरील पुलाचा खांब कोसळल्याने दाभोळे-वाटूळ वाहतूक बंद

रत्नागिरी, दि. 25, डिसेंंबर - लांजा तालुक्यातील दाभोळे-वाटूळ या महत्त्वाच्या राज्य मार्गावरील भांबेड पवारवाडी येथील नदीवरील पुलाचा एक दगडी खांब काल (दि. 23 डिसेंबर) रात्री कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक आज सकाळपासून बंद करण्यात आली आहे. वाहतूक थांबविण्यात आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून बांधकाम विभागामार्फत वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


दाभोळे-वाटूळ हा महत्त्वाचा राज्यमार्ग आहे. राजापूरकडून रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाला जोडणार्‍या रस्त्यावरील या मार्गावर वाहनांची सतत रहदारी असते. तसेच या भागात अनेक क्रशर सुरू असून अवजड वाहतूकही सुरू आहे. या मार्गावर भांबेड पवारवाडी येथील नदीवर पूल आहे. सततच्या रहदारीमुळे गेल्या काही महिन्यांपासून हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता. त्यामुळे या पुलाची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांतून सातत्याने केली जात होती. मात्र त्याकडे बांधकाम विभागाने त्याकडे लक्ष दिले नाही. परिणामी काल रात्री पुलाचा एक दगडी खांब कोसळला. आज सकाळी ही घटना एका ग्रामस्थाच्या लक्षात आली. त्यानंतर बांधकाम खात्याचे कर्मचारी उमाजी कु ळये यांना कळविण्यात आले. त्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविल्यानंतर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.