Breaking News

दुर्गम भागातील आरोग्याच्या उपाययोजना ग्रामसभेतून जाणून घ्याव्यात - डॉ.दीपक सावंत


अमरावती : मेळघाटातील अतिदुर्गम भागातील आरोग्य विषय समस्या ग्रामसभेच्या माध्यमातून जाणून घ्याव्यात आणि त्या सोडविण्याच्या दृष्टीने समन्वय साधावा, यामध्ये प्रामुख्याने कुपोषित बालक, मातामृत्यू, बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विषयक उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी दिले.
डॉ.सावंत यांनी आज जिल्ह्यातील दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी दिल्या. यावेळी त्यांनी दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा आणि आरोग्य विषयक सेवा जाणून घेण्यासाठी त्यांनी या भागाचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत आरोग्य सेवा संचालक डॉ.सतीश पवार, अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील, उपसंचालक डॉ.अंबाडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आसोले आदी उपस्थित होते.

डॉ.सावंत यांनी आज जिल्ह्यातील डोमा, काटकूम, चूर्णी, खामला उपकेंद्राला भेटी दिल्या. डोमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील भेटी दरम्यान त्यांनी याठिकाणी होत असलेल्या प्रसुतींची संख्या, बालमृत्यू, कुपोषणाची माहिती जाणून घेतली. साडेतीन हजार लोकसंख्या असलेल्या उपकेंद्रामध्ये महिन्याला दोन ते तीन प्रसुती होत असल्याची माहिती देण्यात आली. तसेच एप्रिलपासून माता, बालमृत्यू एकही झाला नसल्याची बाब समोर आली. 

बालकांना आरोग्याचे संरक्षण देण्यासाठी लसीकरणाचा इंद्रधनुष मिशन राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सर्व बालकांचे लसीकरण झाले असल्याची माहिती देण्यात आली. पूर्ण संरक्षित बालकांची गणना सुरू आहे. या भागात माता-बालमृत्यू होऊ नये, यासाठी उपायायोजना करण्यात यावे. माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी आशा सेविकांना प्रशिक्षण देण्यात यावे. कमी कालावधीत होणारी प्रसुती सुरक्षितरित्या होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत आशा सेविकांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश डॉ.सावंत यांनी दिले.