Breaking News

शालेय पोषण आहार पुरवठ्यातील दर तफावतीची चौकशी करणार

नागपूर, दि. १८: शालेय पोषण आहारासाठी पुरवठा केल्या जाणाऱ्या धान्याचे बाजारातील दर व प्रत्यक्ष होणाऱ्या पुरवठ्यातील दर यामध्ये तफावत असेल तर त्याची चौकशी केली जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले.आमदार सर्वश्री शरद सोनावणे, सुनिल प्रभू, सरदार तारासिंह, सुनिल केदार, ॲड. राहुल कुल यांनी रायगड जिल्ह्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.


मंत्री श्री. तावडे म्हणाले की, रायगड जिल्ह्यामध्ये आहार शिजवण्यासाठी बचत गटामार्फत धान्य आणि इतर मालाची खरेदी करण्यासाठी ऑगस्ट २०१७ पर्यंत अनुदान जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आले आहे. इंधन व भाजीपाला यासाठी लागणारे ऑक्टोबर २०१७ पर्यंतचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. 

तसेच शाळांमध्ये आहार शिजविणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनासाठी डिसेंबर २०१७ पर्यंत लागणारा निधी वितरित करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील काही शाळांना तांदूळ पुरवठा उशीरा झाल्याने संबंधित पुरवठादाराला दंड आकारण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१७ पासून निविदा प्रक्रियेतून नियुक्त पुरवठादारामार्फत तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा नियमितपणे करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.