Breaking News

बोंडअळी पोटात गेल्याने 42 मेंढ्या दगावल्या

बीड, दि. 22, डिसेंबर - अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे कापसाची झाडे खाताना बोंडअळी पोटात गेल्याने 42 मेंढ्या दगावल्याची घटना घडली. तर शेकडो मेंढ्या अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात येत आहे. नारायण बाळू गवळी, किसन अंकुश चौरे, रामचंद्र व्यंकट गायके आणि कुंबेफळ येथील सुधाकर खंडू हेडे या चार मेंढपाळांनी जवळपास 600 मेंढ्या चरण्यासाठी नेल्या होत्या. 


यातील काही मेंढ्यांनी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे खराब झालेली कापसाची बोंड शेतातून उपटून बांधावर टाकलेली झाडे खाल्ली. यानंतर एकामागोमाग एक मेंढ्या मृत्यूमुखी पडण्याचे सत्र सुरु झाले. या घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अत्यवस्थ मेंढ्यांवर उपचार सुरू केले आहेत. परंतु, बाधित मेंढ्यांचे प्रमाण पाहता आणखी काही मेंढ्या दगावण्याची भीती पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.