Breaking News

काँग्रेस राष्ट्रवादीचा जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा 12 डिसेंबरला

नागपूर, दि. 10, डिसेंबर - सरकारला नाकर्तेपणाचा जाब विचारण्यासाठी 12 डिसेंबर रोजी विधानभवनावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शेकाप, समाजवादी पक्ष, रिपाई (कवाडे) या पक्षांचा एकत्रीत विराट मोर्चा धडकणार आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत अशी माहिती माजी मंत्री अनिल देशमुख आणि माजी मंत्री व विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.


येत्या 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते दिक्षा भूमीजवळ एकत्र येऊन मोर्चाला सुरुवात होईल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते धनवटे कॉलेज जवळ एकत्र येऊन विधान भवनाकडे निघतील. दोन्ही पक्षांचे मोर्चे लोकमत चौकात येतील आणि तिथून एकत्रीतपणे विधानभवनावर धडकतील.केंद्र आणि राज्य सरकार गेल्या तीन वर्षात सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. 

शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी, उद्योगपती, नोकरदार, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरूण कोणीही समाधानी नाही. सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे जनतेत प्रचंड संताप आहे. या संतापाला वाचा फोडण्याचे काम याच जनआक्रोश हल्लाबोल मोर्चाच्या माध्यमातून होणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते, खासदार, आमदार आणि पदाधिका-यांसह राज्याच्या विविध भागातून येणारे लाखो नागरिक या मोर्चात सहभागी होणार आहेत अशी माहिती अनिल देशमुख आणि विजय वडेट्टीवार यांनी दिली.