Breaking News

समृद्धी महामार्गाविरोधात शेतकर्‍यांमध्ये एकजूट महत्वाची - राज ठाकरे

नाशिक, दि. 11, नोव्हेंबर - समृद्धी महामार्गासाठी शेतक-यांमध्ये एकजूट असेल तरच हा प्रश्‍न मार्गी लावला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शेतकर्‍यांशी चर्चा करतांना व्यक्त केले. ठाकरे आजपासून नाशिक जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यात त्यांनी जिल्ह्यातील शेतकर्‍यांशी थेट संवाद साधला. समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या जमिनी घेण्यात येत असल्याचा मुद्दा यावेळी शेतकर्‍यांनी मांडला. त्यात ठाकरे यांनी शेतकर्‍यांना एकजूट दाखविण्याचा सल्ला दिला. या चर्चेवेळी राज ठाकरे यांनी थेट जमिनीवर बैठक मांडत शेतकर्‍यांशी बोलण्यास सुरुवात केली. शेतकरी एकत्र येत नाहीत म्हणून सरकार दबावतंत्राचा वापर करते आहे. तेव्हा तुम्ही एकी कायम ठेवा, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.