Breaking News

मुख्यमंत्री वाक्यागणिक खोटं बोलतात - राजू वाघमारे

औरंगाबाद, दि. 03, ऑक्टोबर - मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस प्रत्येक वाक्यागणिक खोटं बोलून लोकांची सतत दिशाभूल करीत आहेत. ते नरेन्द्र मोदींच्या चालीनेच वागत आहेत  अशी टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली.
या शिवाय मुख्यमंत्री चांगला अभिनय करतात. खोटं बोलणं, अभिनय करणे ते कोणत्या स्कूलमध्ये शिकले तेथे जायला आपल्यालाही आवडेल असेही वाघमारे यावेळी म्हणाले.  मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांची कर्जमाफी, राजमाता जिजाऊ जन्मस्थळ विकासासाठी निधी अशा अनेक घोषणा केल्या मात्र याबाबत दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही याबाबत  त्यांनी माफी मागावी अशी मागणी त्यानी यावेळी केली. वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागातर्फे सामाजिक परिवर्तन अभियान मेळावा झाला. त्यानंतर  ते पत्रकारांशी बोलत होते. कर्जमाफी ऑनलाइन, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ऑनलाइन, पेपर तपासणी ऑनलाइन यात एक मोेठा घोटाळा दिसून येतो. ज्यांना संपवायचं त्यांना हे सरकार  ऑनलाईन जोडतं. या विरोधात काँग्रेस दि. 8 नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळणार आहे. जनआक्रोश मेळावे घेवून काँग्रेस रस्त्यावर उतरणार असे ते म्हणाले.