Breaking News

जायकवाडी शंभर टक्के तरीही औरंगाबादला तीन दिवसांआड पाणी

औरंगाबाद, दि. 03, ऑक्टोबर - जायकवाडी धरणातून औरंगाबादला पाणीपुरवठा केला जातो. धरण 9 वर्षांनंतर शंभर टक्के भरलं आहे. मात्र तरीही  औरंगाबादकरांना तीन दिवसांआडच पाणी मिळणार आहे. कारण शहरापर्यंत मुबलक पाणी पोहोचवण्याची कुठलीही यंत्रणा महापालिकेकडे नाही. त्यामुळे मुबलक पाणी  असूनही औरंगाबादकरांना पावसाळ्यातच महापालिकेवर पाण्यासाठी मोर्चे काढावे लागत आहेत.
आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण काठोकाठ भरून वाहत आहे. नाथसागर नाव असलेलं हे जायकवाडी धरण मराठवाड्याची तहान भागवतं. मराठवाड्याची  राजधानी औरंगाबादलाही इथूनच पाणी मिळतं. मात्र धरण शंभर टक्के भरुनही औरंगाबादकरांना तीन ते चार दिवसांनी पाणी मिळत आहे.
गेल्या 10 वर्षांपासून महापालिका निवडणुकीच्या जाहिरनाम्यात शहराला रोज पाणी देणार हा महत्त्वाची घोषणा असेल. मात्र आजही शहराला रोज पाणी मिळत नाही.  रोज पाणी देण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून समांतर पाणी पुरवठा योजनेची नुसतीच चर्चा झाली. तीन वर्षांपूर्वी शहराला रोज पाणी पुरवाठा व्हावा, यासाठी संमातर  पाणी पुरवठा योजना आखण्यात आली. त्याचं काम एका खासगी कंपनीला देण्यातही आलं. मात्र त्या कंपनीसोबत केलेला करार रद्द करण्याला आला. त्यामुळे  शहराला आज मुबलक पाणी मिळत नसल्याचा आरोप शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला.